Jamkhed News : जामखेड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरंभ फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्ट रोड येथे हा भव्य उत्सव साजरा झाला. कार्यक्रमादरम्यान भगव्य ध्वजांच्या सजावटीत आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोरदार जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी या प्रसंगी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर देवस्थानाला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यात त्यांनी दीन-दुबळ्यांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिला. महाराजांनी कधीही जातीयवाद केला नाही. जेव्हा महाराजांचे नाव येते, तेव्हा त्यांच्या मनात महिलांबद्दल असणारा आदर नेहमी ऐकायला मिळतो. त्यांनी महिलांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्यांची कधीच गय केली नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील तसेच शत्रूच्या स्त्रियांनाही मानाने वागविले. महिलांना जगण्याचा, सुरक्षित राहण्याचा आणि व्यक्त होण्याचा अधिकार दिला. छत्रपतींचे कार्य आणि कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे.” या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यामध्ये नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, गटविकास अधिकारी शुभम जाधव, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांचा समावेश होता. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये नगरसेवक संजय काशीद, प्रा. विकी घायतडक, संतोष गव्हाळे, अमित चिंतामणी, नगरसेविका सिमाताई कुलकर्णी, नंदाताई होळकर, वैशाली म्हेत्रे, राष्ट्रवादीचे शहाजी राळेभात, मंगेश आजबे, बापूसाहेब कार्ले, पांडुरंग माने, शिवसेनेचे नेते आकाश बाफना, शिवकुमार डोंगरे, विशाल लोळगे, रवी बोधले, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद राऊत, ॲड. नितीन राजपुरे, पांडुरंग भोसले, लक्ष्मण भोरे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नागरिकांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, गटविकास अधिकारी शुभम जाधव आणि मुख्याधिकारी अजय साळवे यांनी मनोगत व्यक्त करून आरंभ फाउंडेशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात शिवभक्तांना थंड मठ्ठा वाटप करण्यात आले. आरंभ फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्यांनी या उत्सवासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार जाधव सर यांनी केले, तर आभार उद्धव हुलगुंडे यांनी मानले. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव, योगेश दळवी, सचिन चव्हाण यांनी कडक बंदोबस्त ठेवून कार्यक्रम यशस्वी केला. हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा जागर करण्यासाठी आणि समाजात त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. जामखेडकरांनी या कार्यक्रमात दाखवलेल्या उत्साहाने शिवरायांच्या वारशाचे स्मरण करून नव्या पिढीला प्रेरणा मिळाली.