Jamkhed : अन्न भेसळ करणाऱ्यांची चांदी; जामखेडमधील संशयित व्यवहारांवर कारवाईची मागणी
Jamkhed : जिल्ह्यात सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेचा पुढचा टप्पा जामखेडकडे वळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jamkhed : अहिल्यानगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने अन्न भेसळविरोधी विशेष मोहीम तीव्र केल्यानंतर आता जामखेड तालुक्यातील कथित अन्न भेसळीच्या प्रकारांकडे लक्ष वेधले जात आहे. राहुरी आणि नेवासा तालुक्यांत नुकत्याच झालेल्या कारवाईत सुमारे २ लाख ८४ हजार रुपयांचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आल्यानंतर जामखेडमध्येही अशाच धडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जामखेड शहरासह ग्रामीण भागात दूध, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम, खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये भेसळ होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सण-उत्सवांच्या काळापुरतेच नव्हे, तर दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांबाबतही नागरिकांमध्ये चिंता वाढत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक पातळीवर अन्न भेसळविरोधी कारवाया अपेक्षित प्रमाणात होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. काही ठिकाणी कारवाईच्या नावाखाली केवळ औपचारिकता पार पडत असल्याचा आरोपही केला जात आहे. यामुळे भेसळ करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
दुधाच्या प्रमाणाबाबत शंका –
दरम्यान, तालुक्यातील दूध व्यवसायाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अधिकृत दूध संकलनाच्या तुलनेत बाजारात उपलब्ध होणाऱ्या दुधाच्या प्रमाणाबाबत शंका उपस्थित होत असून, या अतिरिक्त पुरवठ्याच्या स्रोतांची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. काही नागरिकांनी कृत्रिम किंवा भेसळयुक्त दूध निर्मिती होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही.
काही महिन्यांपूर्वी दूध भेसळीप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. तथापि, त्या कारवाईनंतर संबंधितांवर कोणती ठोस कायदेशीर कारवाई झाली किंवा पुढील तपासाची दिशा काय होती, याबाबत स्पष्ट माहिती समोर आली नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्यभरात भेसळविरोधी मोहिमा –
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळविरोधी मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील संशयित भेसळ प्रकरणांचीही सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेचा पुढचा टप्पा जामखेडकडे वळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





