Jambut Gram Panchayat: शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव सोमवारी विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे अविश्वास ठराव संमत झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून सरपंच दत्तात्रय जोरी यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तीव्र नाराजी होती. गावातील विकासकामांच्या नियोजनावरून सदस्यांमध्ये असंतोष होता. निर्णय प्रक्रियेत सदस्यांना विश्वासात न घेणे आणि मनमानी कारभार करणे, असे आरोप जोरी यांच्यावर करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात पारदर्शकता नसल्याचा दावा विरोधी गटाने केला होता. याच कारणांमुळे सदस्यांनी एकत्र येत सरपंचांविरुद्ध नियमानुसार अविश्वास ठराव दाखल केला होता. हेही वाचा – शिरूरमध्ये वीजप्रश्नावरून संताप; रामलिंग रोडसह पेठ भागातील नागरिक अंधारात, रोहित्र बदलण्याची मागणी विशेष सभेतील घडामोडी – या ठरावावर चर्चा आणि मतदानासाठी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला एकूण नऊ सदस्यांनी उपस्थिती लावली. सुरुवातीला ठरावावर सविस्तर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये सदस्यांनी सरपंचांच्या कारभारावर कडाडून टीका केली. त्यानंतर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत बहुसंख्य सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. बहुमत सिद्ध झाल्याने तहसीलदार म्हस्के यांनी सरपंच दत्तात्रय जोरी यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे घोषित केले. पुढील राजकीय समीकरणे – अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे दत्तात्रय जोरी यांना आपले पद सोडावे लागणार आहे. या निकालामुळे जांबुतच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयाला आली आहेत. आता रिक्त झालेल्या सरपंचपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, आगामी काळात गावातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.