अमित शहा यांची श्रद्धांजली
नवी दिल्ली: दिवंगत माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांना भाजपचे अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे की मोदींच्या गरीबांचे कल्याण आणि आर्थिक विकासाच्या संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. भारताला जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था करण्यातही त्यांचे योगदान मोठे होते. आपल्या सर्वंकष अनुभवाच्या आणि अपुर्व क्षमतेच्या आधारावर जेटली यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळाताना पक्ष आणि सरकारच्या कार्यात अमुल्य योगदान दिले आहे.
ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते व बुद्धीमान वक्ते होते. जेटली यांनी एनडीए सरकार मध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या पण त्यांनी पाच वर्षाच्या काळात अर्थमंत्री म्हणून जे योगदान दिले आहे ते विशेष उल्लेखनीय होते असे शहा यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना सामान्य माणसांच्या हिताची सदैव काळजी वाहिली. नोटबंदी, जीएसटी, किंवा काळ्या पैशावरील कारवाई यासारखे निर्णय त्यांच्याच अर्थमंत्रीपदाच्या काळात सत्यात उतरले आणि त्यांच्या निर्णयात त्यांची क्षमताही दिसून यायची असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनाने आपलीही व्यक्तीगत हानी झाली असल्याची भावनाही शहा यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनाने देशाच्या आणि भाजपच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती लवकर भरून निघण्याची शक्यता नाही असेही त्यांनी नमूद केले आहे.