मुंबई : विले-पार्ले पूर्व मुंबई येथील पाडण्यात आलेले जैन मंदीर पुन्हा उभारावे. तसेच अनधिकृतपणे कारवाई करणा–या मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिका–यांचे तातडीने निलंबन कराव, अशी मागणी दक्षिण भारत जैन सभेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. दक्षिण भारत जैन सभा यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत जैन मंदीरावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध दर्शविण्यात आला. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, विले-पार्ले पूर्व मुंबई येथील अधिकृत दिगंबर जैन मंदीर पाडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे देशभरातील जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही मुंबई पालिकेने घाईघाईत मंदीर जमीनदोस्त केल्याने संपूर्ण जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे जैन मंदीर पुन्हा उभारावे आणि जैन मंदीर पाडलेल्यांवर तातडीने कायदेशी कारवाई करावी.
जैन तीर्थक्षेत्र आणि मंदिरे ही भारतीय संस्कृतीचे भूषण आहे. अल्पसंख्यांक जैन समाज हा कायमच देशाच्या विकासासाठी कटीबद्ध असून राज्याच्या चौफेर विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. गेली अनेक वर्षे मुंबईत अहिंसह दिगंबर जैन समाज या जैन मंदिरात पूजा अर्चा करत आहे. असे असताना समाजाचे उपासना स्थळ उद्ध्वस्त करणे चुकीचे आहे. या प्रकरणी शासनाने सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचा–यांना तातडीने निलंबित करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.