काटेवाडी : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठबळ दिले, त्यामुळे याच बळावर पुन्हा नव्याने विकास पर्वाला प्रारंभ झाला असल्याने तुम्हा सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी हा आभार दौरा आयोजित केल्याचे जय पवार यांनी सांगितले. बारामती तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आभार दौर्याचे आयोजन केले होते. त्या निमित्ताने काटेवाडी पालखी ओटा या ठिकाणी जय पवार आले असता ग्रामस्थांनी त्यांचे भव्य असे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी येणार्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक मध्ये जय पवार यांना उमेदवार म्हणून उभा राहण्यासाठी विनंती केली त्यावेळी जय पवार म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगितले आहे की, संपूर्ण बारामती तालुक्यातील व संपूर्ण राज्यातील नागरिकांनी चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद दिली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना मुंबई, पुणे व जय पवार यांना बारामती, दौंड, भोर, इंदापूर असे एकूण सहा तालुक्यांमध्ये पक्ष वाढीसाठी लक्ष देण्यासाठी सांगितले आहे. आम्ही दोघेजण खर्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी अजूनही चांगल्या प्रकारे काम करून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणार आहोत. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या कामाची खर्या अर्थाने पावती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनाच येणार्या सर्वच निवडणुकांमध्ये संधी देण्याचे ठरविले आहे. बारामती तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य विभागासाठी त्याचप्रमाणे व्यवसाय विकासासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी तसेच शेती संदर्भात देखील प्रस्ताव आल्याने या विभागाचा देखील विचार केला जाणार आहे. असे या सर्व विभागासाठी चार व्यक्तींची व्यवस्था केली जाणार असून सर्वसामान्य नागरिकांचे काम होण्यासाठी या चारही व्यक्ती बारामती तालुक्यातून नसणार असून त्या बाहेरील असणार आहेत. यावेळी श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपसरपंच मिलिंद काटे, सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब काटे, राजेंद्र पवार, किरण तावरे, विद्याधर काटे, अनिल काटे, श्रीधर घुले, अजित काटे, जितेंद्र काटे, दत्तात्रय काटे, शीतल काटे, राजेंद्र सोलनकर, शरद काटे, दत्तात्रय देवकाते, संजय काटे, महादेव घुले, दिगंबर मदने, आनंद मोरे, याचबरोबर अनेक नागरिक उपस्थित होते. पवारसाहेबांचा आदर करून बारामतीत मिरवणूक नाही बारामती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय झाला. यावेळी साहजिकच बारामती तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी अजित दादांकडे इच्छा व्यक्त केली की उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिरवणूक बारामतीमध्ये काढावी; परंतु आदरणीय माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांचा आदर करून त्यांच्या मनाचा विचार करून बारामतीमध्ये विजयाची मिरवणूक न काढण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. बारामती मध्ये सर्व जनतेला भेटण्यासाठी सभेचे नियोजन केले असल्याचे जय पवार यांनी सांगितले.