लखनौ – समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा समारंभाचे निमंत्रण नाकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की “जब भगवान बुलाएंगे, जब श्री राम बुलाएंगे हम जायेंगे. तसेच आपण २२ तारखेनंतर सहकुटुंब अयोध्येच्या दर्शनाला जाणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी याआधीच निमंत्रण नाकारले आहे. देशातल्या चारही शंकराचार्यांनी अयोध्येला या कार्यक्रमासाठी जाण्याचे नाकारले आहे.
सपा प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे कळवले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मी माझ्या कुटुंबासह अयोध्येला नक्की भेट देईन, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
तत्पूर्वी, अखिलेश म्हणाले की, आमचा पक्ष देश आणि सनातनच्या परंपरेवर “100 टक्के” विश्वास ठेवतो. कोणालाही देवाच्या निवासस्थानासाठी आमंत्रित केले जाऊ शकते का? आम्ही मंदिरांना अंतरीक इच्छेने भेट देतो. आपला समाज सहिष्णुतेची शिकवण देतो. ज्यांचा संविधानावर विश्वास नाही ते कधीच सनातनी असू शकत नाहीत. आम्ही भीमराव आंबेडकरांना मानणारे लोक आहोत असे ते म्हणाले. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप राम मंदिराचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप इंडिया आघाडीतील पक्षांनी केला आहे.
केवळ राजकीय हेतूने कार्यक्रम
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रे असलेल्या चार पीठांच्या शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार का, असा प्रश्न केला. जर ही प्राणप्रतिष्ठा धार्मिक असेल, तर ती चार पीठांच्या शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली का होत नाही? चारही शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ‘प्राण प्रतिष्ठा’ अपूर्ण मंदिरात करता येत नाही.
म्हणून हा कार्यक्रम जर धार्मिक नसेल तर तो राजकीय असावा. मुहुर्ताची तारीख निश्चित करण्यापूर्वी भाजपने कोणत्या ‘पंचांगा’चा उल्लेख केला? केवळ राजकीय हेतूने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही तारीख निवडण्यात आली असा आरोपही कॉंग्रेसने केला.