कुलीज (अँटिग्वा) – श्रेयस अय्यर व खलील अहमद यांच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर भारत “अ’ संघाने वेस्ट इंडिज “अ’ संघाविरुदच्या एक दिबसीय अनधिकृत सामन्यात 65 धावांनी विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करताना भारत “अ’ संघाची 3 बाद 22 अशी स्थिती होती. त्यामध्ये ऋतुराज गायकवाड, शुभम गिल व कर्णधार मनीष पांडे यांचा समावेश होता. अय्यरने हनुमा विहारीच्या साथीत चौथ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच त्याच्या संघास 190 धावांपर्यंत मजल गाठता आली. त्याने 107 चेडूंमध्ये 77 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 8 चौकार व एक षटकाराचा समावेश आहे. रूवमन पॉवेलने त्याला धावबाद केले. विहारीने 63 चेडूंमध्ये 34 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर भारताकडून मोठी भागीदारी झाली नाही. वेस्ट इंडिज “अ’ संघाकडून द्रुतगती गोलंदाज अकीन जॉर्डनने 43 धावांमध्ये तीन विकेट्स घेतल्या.
कमी धावसंख्या होऊनही भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत वेस्ट इंडिज “अ’ संघाचा डाव 35.5 षटकांत 125 धावांमध्ये गुंडाळला. खलीलने 8 षटकांत केवळ 16 धावा देत तीन गडी बाद केले. अक्षर पटेल (2-16), राहुल चहार (2-32) व वॉशिंग्टन सुंदर (2-37) यांनीही अचूक मारा करीत त्याला यथार्थ साथ दिली. वेस्ट इंडिज “अ’ संघाकडून जोनाथन कार्टर व पॉवेल यांनी प्रत्येकी 41 धावा केल्या. या दोन संघांमधील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 14 जुलै रोजी सर व्हिव्हियन रिचर्डस स्टेडियमवर होणार आहे.