जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज बांसवारा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये बोलताना सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “देशामध्ये सध्या तिरस्काराचे वातावरण निर्माण केले जात असून त्यामुळे देशाची प्रचंड हानी होत आहे. देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आणणाऱ्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे.”
काँग्रेस उमेदवार ताराचंद भागोरा यांच्या मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेसद्वारे केली गेलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील असा विश्वास देखील व्यक्त केला. ते म्हणाले, “राजस्थानमध्ये ज्या प्रमाणे काँग्रेसने सत्तेत येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती त्याचप्रमाणे किमान वेतन योजनेचे आश्वासन देखील पूर्ण केले जाईल. आमची आश्वासने मोदींच्या १५ लाख खात्यावर जमा करण्याच्या आश्वासनांप्रमाणे बोगस नसतात.”