पुणे : देशभरातल्या रेशनिंग दुकानांत दि. 1 एप्रिलपासून अंडी, मटण, चिकनसह मासे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची शिफारस निती आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. मात्र, हा प्रकार सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. यामुळे केंद्र सरकारने विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.
डिसेंबर 2019 मध्ये देशातील गरिब जनतेला पौष्टिक आणि स्वस्त दरात आहार मिळावा, यासाठी रेशन दुकानांमध्ये मांसाहाराची विक्री करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आयोगाने दिला आहे. यामुळे अनेक प्रश्न उभे राहतील. मांसाहारातून अनेक रोग मानवी शरिरात येत आहेत. इतकेच नव्हे तर, संपूर्ण जगात शाकाहाराची लाट आलेली आहे.
वाढणाऱ्या हृदयरोग, कर्करोगावर मात करण्यासाठी जगातील तज्ज्ञ डॉक्टर मांसाहार न करण्याचा सल्ला देतात. या पार्श्वभूमीवर देशात अशाप्रकारे मांसाहाराचा प्रचार करणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने याबाबतचा निर्णय घेऊ नये. नीती आयोगाची शिफारस सरकारने स्वीकारल्यास 6 एप्रिल रोजी शाकाहारी नागरिक जनआंदोलन करत, सरकारचा निषेध करणार असल्याचे डॉ. गंगवाल यांनी सांगितले.
मध्यंतरी कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना रेशन दुकानांमधून स्वस्त दरात कांदे विकले जावेत, असे केंद्राने राज्यांना कळविले. मात्र, एकाही राज्याने त्याची अंमलबजावणी केली नाही. या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांमध्ये मांसाहार विकण्याचा खटाटोप नक्की कोणाच्या हितासाठी केला जात असेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.
यासाठी याची व्यवहार्यता तपासली गेली पाहिजे. सततच्या मांसाहारामुळे निर्माण होणारे अनारोग्याचे प्रश्न लक्षात घेऊन पाश्चिमात्य जगामध्ये आता शाकाहाराची लाट आली आहे. त्यामुळे रेशन दुकानांतून मांसाहारी पदार्थ विकण्याचा निर्णय मागे घेतला जावा, असेही डॉ. गंगवाल म्हणाले.