Ritesh Deshmukh: लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख कुटूंबासह अनेक काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात रितेश देशमुख वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या रितेशचा भाषणादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वडिलांची आठवण सांगताना रितेशला भावना अनावर झाल्या आणि तो मंचावरच रडू लागला. यावेळी भाऊ अमित देशमुखने यांनी रितेशला सावरले. “विलासराव आणि दिलीपराव यांनी भाऊ म्हणून एकमेकांना जपले. या दोन भावांनी एकमेकांपासून आपल्याला काय मिळेल? याचा कधीच विचार केला नाही. आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो, हाच संदेश विलासराव आणि दिलीपराव यांनी दिला. आज साहेबांना जाऊन जवळपास १२ वर्ष झाली. पण आम्हाला वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका नेहमीच आमच्या मागे उभे राहिले. दिलीपराव काकांना अनेकदा बोलता आलं नाही. पण मी आज सर्वांसमोर सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो,” असेही रितेश देशमुख म्हणाले.
पुढे रितेश देशमुखने म्हणाले की, ‘या परिसरात असलेला हा पुतळा पाहून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. एक व्यक्ती आणि एक माणूस म्हणून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली गेली पाहिजे. आपण जन्मापासून विविध भूमिका साकारत असतो. यात माणुसकी जपणारी लोकं हेच खरं भांडवल आहे. माझ्या आजोबांना त्याचा मुलगा मंत्री झाल्यावर कौतुक होते. मात्र, आजोबांना काही पटले नाही तर ते बोलत असतं. विलासराव देशमुख यांना त्याच्या वडिलांनी एका पेपरची कटिंग दाखवत वैयक्तिक टीका करू नका, अशी शिकवण दिली. हे तेच संस्कार आहेत, याचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत.’
सध्याच्या राजकारणावर काय म्हणाले रितेश देशमुख?
“आम्ही वैयक्तिक टीका करत नाही. आज राज्याच्या राजकारणात जे टीकास्त्र सुरू आहे ते योग्य नाही. माझे आजोबा आणि वडील विलासरावांचे नाते अतिशय आदरयुक्त होतं. आपला मुलगा मुख्यमंत्री झाला, याचे आजोबांना कौतुक होतं. पण त्यांना कुठली गोष्ट खटकली तर ते आवर्जून सांगायचे. विलासराव लातूरला आले की, ते आजोबांची भेट घ्यायला जुन्या घरी जायचे. एकदा असेच भेटायला आले असताना आजोबांनी जुन्या वर्तमानपत्रातील बातमी बाबांना दाखविली. आजोबा म्हणाले, या बातमीत तुमचे भाषण छापून आले आहे. या भाषणातील तुमची टीका थोडी वैयक्तिक होत आहे. राजकारणात टीका करत असताना व्यक्तिगत टीका करू नका, असे आजोबांनी सांगितलं”, अशी आठवण रितेश देशमुख यांनी सांगितली.