सीएएवरुन भूमिका बदलणाऱ्या शिवसेनेवर मनसेची बोचरी टीका
मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशपातळीवरील राजकारण ढवळून निघात आहे. केंद्र सरकारच्या या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. आजही अनेक भागांत सीएएविरोधात निदर्शने सुरु आहेत. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या साथीने सत्तेत आलेल्या शिवसेनेने सीएएला आता आपला पाठींबा दर्शविला आहे.
शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी, सीएएला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, असे वक्तव्य केले.
उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याचा धागा पकडत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा, तर राज्यसभेत विरोध. पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा. हे वाघ आहे का बेडूक? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.