IRCTC New Rules: भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे, ज्यामुळे आता प्रवाशांना आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करणे अनिवार्य असणार आहे. रेल्वेने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, IRCTC च्या वेबसाइट आणि मोबाईल ॲपद्वारे सकाळी ८ ते १० या वेळेत तिकीट बुक करण्यासाठी आधार लिंक केलेले असणे आवश्यक आहे. हा नियम लागू करण्याचा मुख्य उद्देश तिकीट बुकिंगमध्ये होणारी फसवणूक थांबवणे आणि खऱ्या प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळण्यास प्राधान्य देणे हा आहे. सकाळी ८ ते १० ही वेळ तिकीट बुकिंगसाठी सर्वात जास्त व्यस्त मानली जाते. या वेळेत एजंट्स किंवा काही लोक मोठ्या प्रमाणात तिकीट बुक करून त्यांची जास्त दरात विक्री करतात, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना त्रास होतो. काय बदलले? सकाळची वेळ: सकाळी ८ ते १० या वेळेत, ज्या IRCTC अकाउंट्सचे आधार प्रमाणीकरण झाले आहे, केवळ तेच प्रवासी तिकीट बुक करू शकतील. प्रमाणीकरण नसेल तर: आधार लिंक न केलेले प्रवासी सकाळी १० नंतर तिकीट बुक करू शकतील. PRS काउंटर: रेल्वे स्टेशनवरील कॉम्प्युटराइज्ड PRS काउंटरवरून तिकीट बुकिंगवर या नियमाचा परिणाम होणार नाही. तत्काळ तिकीट: तत्काळ तिकीट बुकिंगसाठी यापूर्वीच आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आधार कसे लिंक करावे? प्रवाशांनी IRCTC अकाउंटमध्ये ‘My Profile’ सेक्शनमधील ‘Authenticate User’ या पर्यायाचा वापर करून ओटीपी (OTP) द्वारे आधार लिंक करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. हा डिजिटल आणि पारदर्शक उपक्रम रेल्वे तिकीट प्रणालीची विश्वासार्हता वाढवेल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.