iran israel war : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता देशातील उद्योगांवरही दिसू लागला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका मद्य उद्योगालाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात दारूचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मद्यनिर्मिती कंपन्यांकडे सध्या काचेच्या बाटल्या आणि अॅल्युमिनियम कॅनचा साठा केवळ १५ दिवसांपुरता उरला आहे. त्यामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात व्हिस्की उत्पादन करणाऱ्या तसेच बिअर तयार करणाऱ्या मिळून सुमारे १२ कंपन्या कार्यरत आहेत. २०२५ अखेरपर्यंत येथे सुमारे ४८३२.८३ कोटी रुपयांचे मद्य उत्पादन झाले होते. यामध्ये सुमारे १.२६ कोटी लिटर विदेशी दारू आणि १.४० कोटी लिटर बिअर उत्पादनाची नोंद आहे. मद्यनिर्मिती प्रक्रियेत काचेच्या बाटल्या आणि अॅल्युमिनियम कॅन तयार करण्यासाठी औद्योगिक गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. संभाजीनगरमध्ये दररोज सुमारे ४.५ लाख काचेच्या बाटल्या आणि ३ लाख कॅन तयार केले जातात. माहितीनुसार, एका गॅस सिलेंडरमधून सुमारे ५ हजार बिअर कॅन तयार होतात. त्यामुळे एका कंपनीला दररोज सुमारे १५० सिलेंडरची गरज असते. जिल्ह्यातील सहा प्रमुख कंपन्यांना मिळून रोज जवळपास ९०० सिलेंडर लागतात. सध्या कंपन्यांकडे फक्त १५ दिवसांचा साठा असल्याने त्यानंतर उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दर महिन्याला सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. मद्य उद्योगावर परिणाम झाल्यास त्याचा फटका राज्याच्या महसूलालाही बसू शकतो. कारण मद्य विक्रीतून मिळणारा Maharashtra State Excise Department चा महसूल मोठ्या प्रमाणात असतो. दरम्यान, परदेशात होणारी मद्य निर्यातही बंदरांमध्ये कंटेनर अडकून पडल्यामुळे ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास मद्य उद्योगासोबतच राज्य सरकारच्या महसूलावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.