दुबई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील प्ले-ऑफ गटात अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने आपले स्थान मिळवले असले तरीही त्यांना आता यापुढील प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे. अर्थात त्यांच्या संघाची प्रगतीशील कामगिरी पाहता दिल्ली कॅपिटल्ससमोर मुंबईच्या बलाढ्य फलंदाजीला रोखण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. प्ले-ऑफच्या सामन्यांना आजपासून प्रारंभ होत आहे.
स्पर्धेतील आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात दिल्लीने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा पराभव करत प्ले-ऑफमधील स्थान मिळवले. हा सामना गमावल्यानंतर बेंगळुरू संघही सरस धावगतीच्या आधारावर या गटात दाखल झाला आहे. आज मुंबई व दिल्ली यांच्यात होत असलेला सामना विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी महत्वाचा आहे. साखळी सामन्यांमध्ये दिल्लीची कामगिरी संमिश्र राहिलेली आहे. तसेच अखेरच्या साखळी लढतीतही त्यांच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केली होती.
सलामीवीर पृथ्वी शॉ, शिखर धवन यांना यंदाच्या स्पर्धेत म्हणावे तसे सातत्य राखता आलेले नाही. बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात धवन व अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी केली असली तरीही संघाला विजय मिळवून देताना त्यांनी अत्यंत बेजबाबदार पद्धतीने आपल्या विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी मार्क स्टोनिसने खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहत संघाला विजय प्राप्त करून दिला. मात्र, या सामन्यात त्यांची फलंदाजी ज्या दर्जाची झाली ते पाहता प्ले-ऑफमधील सामन्यात ते जसप्रीत बुमराह, ट्रेन्य बोल्ट यांच्यासह मुंबईच्या भक्कम गोलंदाजीचा सामना कसा करतील याचीच चिंता त्यांना राहणार आहे.
कर्णधार श्रेयस अय्यरने सुरुवातीच्या सामन्यांत सरस कामगिरी केली असली तरीही नंतरच्या सामन्यांत त्याला सातत्याने अपयश येत आहे. तसेच शेमरन हेटमायर, ऋषभ पंत, अक्सर पटेल यांची कामगिरी देखील समाधानकारक होत नसल्याचाही फटका त्यांना बसलेला आहे. गुणतालिकेत अग्रस्थान मिळवणारा हा संघ नंतरच्या पराभवांमुळे प्ले-ऑफमध्येही स्थान मिळवेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामनाने त्यांची गोलंदाजी सरस आहे. त्यांचा कागिसो रबाडा सातत्याने बळी मिळवत असल्याने मुंबईच्या बलाढ्य फलंदाजीला रोखण्याच्या प्रमुख आव्हानाचा त्यालाच सामना करावा लागणार आहे. त्याच्या जोडीला अनरिच नोर्जे व रवीचंद्रन अश्विन यांच्यावरही त्यांची गोलंदाजी अवलंबून राहणार आहे.
मुंबईबाबत बोलायचे झाले तर त्यांची फलंदाजी यंदाच्या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य मानली जात आहे. इशान किशन, कॉन्टन डीकॉक, हार्दिक पंड्या, कर्णधार कॅरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव व कृणाल पंड्या अशी तगडी फलंदाजी असलेल्या मुंबईच्या फलंदाजीला दिल्लीचे गोलंदाज रोखण्यात यशस्वी ठरले तरच त्यांना विजयाची अपेक्षा करता येणार आहे. केवळ फलंदाजीच नव्हे तर त्यांची गोलंदाजी देखील दिल्लीपेक्षा जास्त भेदक आहे.
यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन यांच्या वेगाचा दिल्लीच्या फलंदाजांना सामना करावा लागणार आहे. त्यातही बोल्ट व बुमराह यांनी डेथ ओव्हर्समध्ये कमालीचे सातत्य राखल्याने त्यांनी जवळपास 80 ते 90 टक्के वेळा प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येत रोखले आहे. तसेच त्यांची फिरकी गोलंदाजीही प्रभावशाली राहिलेली आहे. त्यांचा कृणाल पंड्या व राहुल चहर यांनी यंदाच्या स्पर्धेतील सर्वच संघांच्या बलाढ्य फलंदाजीवर अंकुश राखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबईचेच पारडे जड राहणार अशीच शक्यता आहे.
पॉवर हिटर्स लक्षवेधी ठरणार
मुंबई व दिल्ली या दोन्ही संघात आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे या सामन्यात चौकार व षटकारांची आतषबाजी होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघातील याच पॉवर हिटर्समधील चुरस रंगतदार होणार आहे. दिल्लीकडे शॉ, धवन, स्टोनिस व अय्यर तर, मुंबईकडे कर्णधार पोलार्ड, पंड्या, किशन, डीकॉक व सूर्यकुमार असे पॉवर हिटर्स असल्याने या सामन्यात त्यांचीच कामगिरी लक्षवेधी ठरेल.