‘आंतरराष्ट्रीय रिसॉर्ट राजकारण ! विशाखापट्टणमच्या महापौरांविरुद्ध अविश्वास ; नगरसेवक चक्क श्रीलंका-मलेशियाला रवाना

International resort politics । आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमचे महापौर जी. हरी वेंकट कुमारी यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. ज्यावर येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामुळे आता राज्यात ‘आंतरराष्ट्रीय रिसॉर्ट राजकारण’ सुरू झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) यांनी त्यांच्या नगरसेवकांना विरोधी पक्षाच्या संपर्कात येऊ नये म्हणून इतर ठिकाणी म्हणजे चक्क देशबाहेर पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, टीडीपीने आपले नगरसेवक मलेशियाला पाठवले आहेत, तर वायएसआरसीपीने आपले नगरसेवक श्रीलंकेला पाठवले आहेत. या हालचालीचा उद्देश नगरसेवकांना त्यांच्या बाजूने ठेवणे आणि अविश्वास प्रस्तावावरील मतदानादरम्यान कोणत्याही राजकीय उलथापालथी टाळणे आहे हा आहे. विशाखापट्टणम महानगरपालिकेत सध्या वायएसआर काँग्रेस पक्षची सत्ता आहे. मेयर जी. हरी वेंकट कुमारी आणि दोन्ही उपमहापौर जे. श्रीधर आणि के. सतीश हे देखील याच पक्षाचे आहेत, परंतु गेल्या वर्षी राज्यात सत्तेबाहेर राहिल्याने वायएसआरसीपी कमकुवत होत चालली आहे. त्यांचे अनेक नेते आता तेलुगू देसम पक्षात (टीडीपी) सामील होत आहेत.
प्रत्येक पक्षाचे किती नगरसेवक ? International resort politics ।
टीडीपीने २२ मार्च रोजी महापौर कुमारी यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दिला होता. यावर १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून, दोन्ही पक्षांनी त्यांचे नगरसेवक मलेशिया आणि श्रीलंकेला पाठवले आहेत जेणेकरून ते दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात येऊ नयेत. जीव्हीएमसीमध्ये एकूण ९८ नगरसेवक आहेत. यापैकी वायएसआरसीपीचे ५९ नगरसेवक आहेत. टीडीपीकडे २९ नगरसेवक आहेत आणि त्यांच्या मित्रपक्ष जनसेना पक्षाचे (जेएसपी) तीन नगरसेवक आहेत. भाजप, सीपीआय आणि सीपीआय(एम) यांच्याकडे प्रत्येकी १ जागा आहे.
टीडीपीचा मोठा दावा International resort politics ।
गेल्या वर्षी जूनमध्ये, टीडीपीच्या नेतृत्वाखालील एनडीए युती राज्यात सत्तेत आली. यानंतर, सुमारे २५ वायएसआरसीपी नगरसेवक टीडीपीमध्ये सामील झाले आहेत. आता, टीडीपीचा दावा आहे की त्यांना ६५ ते ७० नगरसेवकांचा पाठिंबा आहे तर अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी त्यांना ७४ मतांची आवश्यकता आहे. टीडीपी नेते पी. श्रीनिवास राव यांनी ६९ नगरसेवकांच्या पाठिंब्याने अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. जेएसपीचे आमदार वंशी कृष्णा म्हणतात की त्यांना सुमारे ७० नगरसेवकांचा पाठिंबा आहे आणि मतदानापूर्वी ही संख्या आणखी वाढू शकते.
सर्व नगरसेवकांचा खर्च पक्ष उचलणार
कोणताही नगरसेवक इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात येऊ नये म्हणून, टीडीपीने आपले नगरसेवक मलेशियाला पाठवले आहेत. टीडीपी अध्यक्ष पल्ला श्रीनिवास राव यांनी, सुमारे २६ नगरसेवक क्वालालंपूरमध्ये आहेत. पक्षाने त्यांचा सर्व खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे, वायएसआरसीपीने देखील प्रथम आपल्या नगरसेवकांना बेंगळुरूजवळील एका रिसॉर्टमध्ये ठेवले आणि नंतर त्यांना श्रीलंकेला पाठवले. उपमहापौर गियानी श्रीधर म्हणाले की ते सध्या कोचीमध्ये आहेत आणि ३० नगरसेवक श्रीलंकेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जर टीडीपीने हा प्रस्ताव जिंकला तर ते विशाखापट्टणम महानगरपालिका ताब्यात घेतील. २०२४ च्या निवडणुकीत, टीडीपीने शहरातील सर्व ७ विधानसभा जागा जिंकल्या आणि लोकसभा निवडणुकीतही दणदणीत विजय मिळवला.





