– गोपाळ कदम
पाक-अफगाणिस्तान सीमेवर ड्युरंड लाइन ही सीमारेषा आहे. नंतर ती कुंपणाने बंदिस्त केली गेली. या दोन देशांदरम्यान शतकानुशतके वास्तव्य करणारी पख्तून आदिवासी जमात या सीमेने दोन देशांत विभाजित झाली आहे. सध्या पाकिस्तानातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पख्तुनिस्तान ही मागणी जोर धरू शकते.
पाक-अफगाणदरम्यानची सीमारेषा “ड्युरंड लाइन’ म्हणून ओळखली जाते. ब्रिटिश मुत्सद्दी सर मॉरटीमर ड्युरंड यांनी 1893 मध्ये ब्रिटिश इंडिया व अफगाणिस्तानला विभाजित करणारी ही रेषा आखली. मात्र, ती कागदोपत्रीच होती. भारत-पाकदरम्यान फाळणी झाली, तरीदेखील पाक-अफगाणदरम्यानची सीमा मुक्त होती. दोन्ही बाजूला पख्तून जमातीचे प्राबल्य. भाषा, रीतिरिवाज, संस्कार अन् जीवनपद्धतीवर पख्तून आदिम जमातीचा पगडा. दोन देशांत भलेही सीमारेषा असो, पख्तून जमातीला हा भेद मान्य नव्हता. अफगाणिस्तान सरकारदेखील यास अधिकृतपणे सीमारेषा मान्य करीत नव्हते. नंतर मात्र पाकने ही सीमारेषा आंतरराष्ट्रीय सीमा मानून त्याची सरहद्द तारेच्या कुंपणाने 2021 मध्ये बंदिस्त केली.
अफगाणिस्तानच्या आजवरील कोणत्याही सरकारने या सीमारेषेविषयी आंतरराष्ट्रीय व्यासपीठापुढे हरकत, तक्रार अथवा निषेध नोंदविला नसल्याने पाकने घेतलेला एकतर्फी निर्णय अफगाण सरकारला निमूटपणे मान्य करावा लागला होता. पख्तून जमातीला मात्र हा आपल्या संस्कृती अन् समाजावर घाला वाटला. हिंदुकुश पर्वतराजी, काही ठिकाणी वाळवंट, दऱ्या-खोऱ्या, हिवाळ्यात उणे 20 अंश सेल्शियस तापमान, धडकी भरविणारे नदी-नाले अन् प्रतिकूल हवामानाशी पख्तून समाज वर्षानुवर्षे संघर्ष करतोय. शिवाय अमेरिका व रशियासारख्या दोन बलाढ्य जागतिक महासत्तेचा सामना ही लढवय्यी जमात करीत आहे.
पाकिस्तान सरकारने या मुक्त सीमेमुळे अनेक संकटे झेलली आहेत. सोव्हिएत रशियाने अफगाण पादाक्रांत केल्याने अफगाणिस्तान हा अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तेच्या दरम्यान शीतयुद्धाचा बळी ठरला. 9/11 नंतर अमेरिकेने ही भूमी भाजून काढली. वरील लढ्यातून एके 47 संस्कृती घरोघरी पोहोचली. पाकिस्तानला याचा मोठा संसर्ग झाला. निर्वासितांचे लोंढे पाकच्या गळ्यात पडले. त्यांच्यातून तालिबान उभे केले गेले. लादेनसाठी ही भूमी पोषक ठरली. जिहादी-अन दहशतवादाची नवी ओळख पाकला अफगाण संघर्षाने दिली. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे उभय देशांतील मुक्त सीमा व दोन देशांतील नागरिकांचा अनिर्बंध संचार.
अंमलीपदार्थांची तस्करी तर येथील मुख्य व्यापार. त्याची लागण पाकच्या समाजजीवनाला झाली. यातून असंख्य समस्यांना सामोरे जाताना पाकला रामबाण उपाय सुचला होता तो म्हणजे सीमाबंदीचा. 2016 मध्ये पाक सरकारने या कामास प्रारंभ केला. 2,670 कि.मी. लांबीच्या या सीमेला बारा फूट उंचीच्या तारेच्या कुंपणाने बंदिस्त केले गेले. 750 टेहळणी मनोरे आहेत. सीसीटीव्ही, रडार, नाइट व्हिजन साधने, सेन्सर, सर्च लाइट आदींनी ही सीमा बंदिस्त केली गेली आहे. काही ठिकाणी तर भू-सुरूंग देखील पेरलेले आहेत.
यामुळे अफगाण सरकार व पख्तून समाजात पाकविरोधात तीव्र पडसाद उमटले होते. पासपोर्ट, व्हिसा अन् तपासणी नाके या बाबी सीमेवरील नागरिकांना आपल्या मानवी अधिकारांची गळचेपी वाटते. दैनंदिन गरजेसाठी ये-जा करणाऱ्यांवर बंदी आहे. औषधोपचाराकरीता सीमापार जाणाऱ्यांना कायद्याचा बडगा पाहायला मिळतोय. छोटे-मोठे व्यापारी आपला व्यापार, उदीम करण्यापासून वंचित झाले आहे.
पाकने मोठी धूर्त खेळी करून ही सीमा बंद केली आहे. यामागे आणखी एक अनामिक भीती पाक राज्यकर्त्यांना वाटत होती, ती म्हणजे स्वतंत्र पख्तुनिस्तान या मागणीची. अधूनमधून तेथे हा स्वर उमटत असतो. मुळातच येथील समाज हा पूर्वापार भारताच्या बाजूने. कारण देशाची फाळणी होताना त्यास विरोध करणारे खान अब्दुल गफार खान याच भूमीतील. तेव्हा हा प्रांत फ्रॅंटियर प्रॉव्हिन्स म्हणजे वायव्य सरहद प्रांत म्हणून ओळखला जातो. पुढे याचे पाकने नामांतर केले. खैबर पख्तून ख्वा म्हणजे “केपीके’ नावाने हा प्रांत ओळखला जात आहे. याला लागून पाकच्या केंद्रशासित “फाटा’चा भूभाग आहे.
पाकची निर्मिती झाल्यावर आमचे स्वतंत्र अस्तिस्व असावे म्हणून या समाजाने आवाज उठविला. पाक राज्यकर्ते सरहद गांधी व त्यांच्या अनुयायांना “गद्दार’ म्हणून संभावना करीत. पाक-अफगाण सीमा बंदिस्त केली नाही तर उद्या पख्तून समाजातून स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागल्यास त्यास सैन्य बळावर रोखणे पाकला अन् अफगाण सरकारला देखील कठीण जाईल, याची अनामिक भीती दोन्ही बाजूंच्या राज्यकर्त्यांना वाटत होती. आधीच बलुचिस्तानच्या उठावाने त्रस्त पाकने हा धोका ओळखला होता.
सीमेवर कुंपण असले तरी जेथे प्रवेशद्वार आहे, तो 24 तास खुला असेल. कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया सुलभ व जलद असेल. युरोप किंवा आखाती देशांत ज्या प्रमाणे सहज साध्य दळणवळण होते, त्या धर्तीवर पाक-अफगाण सीमा असेल, असे पाकने म्हटले होते. मात्र पाकच्या भूमिकेवर नागरिकांचा विश्वास नाही. कारण, भविष्यात पाकने सीमेवरील बंधने कडक केली तर? अफगाणिस्तानची सीमा पाकशिवाय इराण, तजाकिस्तान, उजबेकिस्तान अन् तुर्कमेनिस्तानशी संलग्न आहे. पाकच्या दाव्यानुसार, वरील देशांची सीमारेषा अफगाणिस्तानने निश्चित केलेली नाही. तत्कालीन ब्रिटिश सरकार अन् रशियाचे राजे झार यांनी ती ठरविली. मग अफगाण सरकार वरील आंतरराष्ट्रीय सीमा मान्य करताना फक्त ड्युरंड लाइनला विरोध कसा काय करू शकतो?