दत्तात्रय आंबुलकर
घरी कुणाचे देहावसान झाले तर त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार व नंतर तिसऱ्यापासून तेराव्या दिवसांपर्यंतचे क्रिया-संस्कार आपण नेहमीच पाहतो. यामध्ये प्रसंगी विशेषतः ग्रामीण भागात तर आर्थिक विवंचनेला कंटाळून कर्जबाजारी शेतकरी आडावरचा फास गळ्याभोवती आवळून आत्महत्या करण्याचे प्रकार दुर्दैवाने अद्यापही होत आहेत. मात्र, अशावेळी सरकारकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या वा मिळू घातलेल्या शासकीय मदतीतून मृत व्यक्तीच्या तेरवीला गावभोजनाच्या पंगती झडताहेत.
मात्र, ही प्रचलित खर्चिक व्यवस्था-परंपरेला छेद देणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे नुकतीच दिसून आली. बल्लारपूर येथील पांडुरंग खरवडे यांचे निधन झाले. त्यांचे वय 85 वर्षे होते व स्वतःचे तत्त्व आणि कर्तव्य यांच्याशी ते कटिबद्ध होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पांडुरंग खरवडे यांना दुर्धर रोग आणि उपचारांशी सामना करावा लागला व त्यातच त्यांचे निधन झाले.
रितीरिवाजाप्रमाणे खरवडे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर त्यांच्या तेरवी-चौदवीच्या नियोजनाची चर्चा त्यांच्या घरी आणि नातेवाईकांमध्ये सुरू झाली. त्यानुसार अंत्यसंस्कारांनंतर गावातील स्मशानभूमीजवळील नदी प्रवाहात रक्षाविसर्जन करण्याबद्दल प्रथेप्रमाणे विचारणा सुरू झाली.
मात्र, अशा प्रकारे पांडुरंगजींच्या रक्षाविसर्जनाची तयारी सुरू असतानाच त्यांच्या कुटुंबातील जावई असणारे व राज्य सरकारच्या वन-विभागातील सेवानिवृत्त अधिकारी असणारे बाबुराव मेंढे यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात राख टाकून आपण नदी प्रदूषित करणार याबद्दल हळहळ व्यक्त केली. त्यांनी या मुद्द्यावर पांडुरंगजींचा मुलगा निलेश व खरवडे कुटुंबातील मुलींशी पण चर्चा केली व त्यांना आपली भावना आणि भूमिका समजावून सांगितली.
वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतरच्या
दुःखातही भावनांच्या प्रवाहात वाहून न जाता पर्यावरण-निसर्गरक्षणाचा विचार करून पांडुरंग खरवडे यांच्या मुलाने त्यांनी मांडलेला विचार स्वीकारला. सून आणि मुलीने पण या विचाराला दुजोरा दिला. यातूनच मग वेगळ्या पद्धतीने व आधुनिक मार्गाने पुढील विधी-सोपस्कार पार पडले.
त्यानुसार धार्मिक विधीसाठी आवश्यक अस्थी वगळता उर्वरित रक्षा नदीत न टाकता या परिवाराने स्वतःच्या शेतातच पुरली-विखुरली. एवढेच नव्हे तर या विधींच्या निमित्ताने पाच वेगवेगळी झाडे लावली. मृतात्म्याला दाखविण्याचा नैवेद्य पण याच नव्याने लावलेल्या झाडांना दाखविण्यात आला.
यापुढे वडिलांच्या स्मृतीनिमित्त या झाडांची जपणूक करण्याच्या निर्धारापोटी पांडुरंगजींचे मुले-नातवंडे आपल्या शेतात लावलेल्या झाडांपुढे नतमस्तक झाले. हे सारे करताना मरणाऱ्यांच्या तेरवीच्या निमित्त होणारी प्रस्तावित जेवणावळ अर्थातच रद्दबादल ठरली. परिणामी पांडुरंग खरवडे यांची नाळ मृत्यूनंतरही त्यांचा परिवार आणि शेतीशी जोडली गेली व ती कुठलाही वाजवी वा अनावश्यक खर्च न करता. एका शेतकऱ्याला त्याच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहण्याचा हा श्रद्धोयुक्त प्रयत्न म्हणूनच अनुकरणी ठरतो.