पुणे – पावसाळ्यात तातडीची रस्ते दुरुस्ती करण्यासाठी आता महापालिकेकडून चाचपणी सुरू आहे. त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर “रिऍक्टिव्ह ऍसफाल्ट’ या मिश्रणाचा वापर करून रस्ते दुरुस्ती करणे शक्य आहे का, यासाठी मंगळवारी प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुलाखाली काही खड्डे या मिश्रणाने बुजविण्यात आले आहेत.
हे मिश्रण पाणी असलेल्या खड्ड्यातही वापरणे शक्य असून त्यावरून रोड रोलर फिरविण्याची गरजही भासत नसल्याचे या प्रात्यक्षिकातून दिसून आले. दरम्यान, या खड्ड्यांचे पुढील दोन ते तीन दिवस निरीक्षण केले जाणार असून, त्यानंतर काही ठिकाणी त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रयोगावेळी या खड्ड्यांमध्ये आधी पाणी टाकण्यात आले. त्यानंतर थेट “रिऍक्टिव्ह ऍसफाल्ट’चे मिश्रण टाकण्यात आले. हे मिश्रण अवघ्या काही सेंकदांत घट्ट होण्यास सुरुवात झाली. नंतर खड्डा पूर्ण भरून रस्ता एकसमान करण्यात आला.
काही क्षणांतच या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली. पुढील पाच मिनिटांत या खड्ड्यावरून तीन ते चार पीएमपी बस, दुचाकी वाहने, कार गेल्या. मात्र, मिश्रण कुठेही बाजूला निघालेले नव्हते. हे मिश्रण वाहनांच्या टायरलाही चिकटले नाहीच, शिवाय ते पसरलेही नव्हते. या उलट वाहनांच्या वजनाने ते अधिक घट्ट झाल्याचे या प्रात्यक्षिकात दिसून आले.
संबंधित कंपनीकडून या मिश्रणाचे प्रात्यक्षिक ठेवले होते. पावसाळ्याच्या अनुषंगाने ते पाहण्यात आले. या मिश्रणामुळे खड्डे बुजले असले, तरी पुढील तीन- ते चार दिवस या खड्ड्यांची स्थिती काय आहे, हे पाहण्यात येईल. त्यानंतर याबाबत अधिकारी तपासणी करतील. मगच पुढील निर्णय घेतला जाईल.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा