बाह्यवळणबाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही
मंचर -खेड-सिन्नर महामार्गावरील भूसंपादन कामामध्ये कमी मोबदला मिळालेल्या शेवाळवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्यांना जमीन मोबदला देताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. तेथील शेतकऱ्यांना जमिनींना योग्य मोबदला देण्याची ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 खेड ते सिन्नर महामार्गावरील मंचर बाह्यवळण कामासाठी शेवाळवाडी येथील सुमारे 45 ते 50 शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करण्यात आले. या संपादनामध्ये शेतकऱ्यांना निश्चित करण्यात आलेल्या रकमेपेक्षा सुमारे 80 हजार ते 1 लाखापर्यंत कमी भाव देण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांची पाइपलाइन, विहीर व बोअरवेल आदींची नुकसान भरपाई प्रशासनाने निश्चित केलेली नाही. याबाबत शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत भूसंपादन विभागाचे अधिकारी व शेतकरी शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान येथील शेतकर्यांवर झालेला अन्याय जिल्हाधिकारी नवल किशोरराम यांच्या निदर्शनास आणून देत बाधित शेतकऱ्यांना योग्य दराने नुकसान भरपाई अदा करण्याची मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. तसेच बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना शासकीय नियमानुसार चालू बाजारभावाने चारपट मोबदला देणे आवश्यक असताना बाजारभावाच्या तीनपट मोबदला देण्यात आल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
याविषयीची सविस्तर माहिती भूसंपादन विभागाने तात्काळ सादर करण्याचे निर्देश देत आठ दिवसांत पुन्हा बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिष्टमंडळास दिली.