मल्हारपेठ – शिधा पत्रिकेवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सध्या सोशल मिडियासह काही माध्यमातून बनावट अर्ज (फॉर्म) प्रसिद्ध केला जात आहे. असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नाही. नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सोशल मीडिया तसेच काही माध्यमातून रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. परंतु, सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
सध्या राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही, यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या माहितीव्दारे जनतेची फसवणूक होऊ शकते.