दुष्काळामुळे सर्वच डाळी शंभरी गाठण्याची भीती
पुणे – राज्यात पडलेल्या दुष्काळाचा फटका डाळींना बसला आहे. विशेषत: तूर आणि हरभरा डाळीवर जास्त परिणाम झाला आहे. या दोन्हींसह सर्व डाळींची आवक निम्म्यावर आली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत ती अपुरी असल्याने डाळी आणि कडधान्यांच्या भावात पंधरा दिवसात किलोमागे दहा ते बारा रुपयांची वाढ झाली आहे. सध्याच्या डाळींचा साठा पाहता सर्वच डाळी लवकरच 100 रुपये प्रति किलोच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
“येथील भुसार बाजारात लातूर, बार्शी, सोलापूर परिसरातून तूरडाळ, राजस्थान येथून मूगडाळ, आंध्रप्रदेशातून उदीड डाळ, मध्यप्रदेशातून मसूर डाळ, राजस्थानातून मटकी दाळ तर लातूर, अकोला, बार्शी येथून हरभरा डाळीची आवक होते. राज्यात पडलेला दुष्काळ यासह इतर राज्यांमध्ये घटलेल्या उत्पादनाचा परिणाम डाळींच्या भाव वाढीवर झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच डाळींच्या आयातीवर बंदी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ही वाढ कायम राहिल. तसेच, सध्याच्या डाळींचा साठा पाहता सर्वच डाळी लवकरच शंभर रुपये प्रति किलोच्या घरात जाण्याची शक्यता आहे,’ असे नितीन नहार यांनी सांगितले.
डाळींसोबतच कडधान्यांचेही भाव वाढ झाल्याचे व्यापारी विजय राठोड यांनी सांगितले. ते म्हणाले, “कडधान्यांमध्ये सर्वाधिक वाढ मटकीच्या भावात झाली आहे. बाजारात सेलम मटकीच्या प्रतिकिलोस 105 ते 110 रुपये भाव मिळत आहे.