भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वेळ – दुपारी 1ः30 पासून
ठीकाण – चेन्नई
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
चेन्नई – मिचेल स्टार्कची तुफानी गोलंदाजी व मिशेल मार्शची वादळी फलंदाजी यांच्यासमोर आज (बुधवार) होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाला आपला खेळ कमालीचा उंचवावा लागणार आहे. दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकले असल्याने हा तिसरा सामना मालिकेचा विजेता ठरवणार आहे.
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत आलेले अपयश दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मागे टाकले व अफलातून कामगिरी केली. त्यांच्या मिचेल स्टार्कसह सर्वच गोलंदाजांनी भारताच्या बलाढ्य फलंदाजीचा पालापाचोळा केला. अवघ्या 117 धावांवर भारताचा डाव संपवल्यावर ट्रेव्हीस हेड व मिशेल मार्श यांनी 11 षटकांतच 121 धावा करत दहा गडी राखून ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकून दिला. आता तिसरा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रलियाचेच पारडे जड राहणार आहे.
हेड व मार्श हे त्यांचे सलामीवीर भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. त्यातच कर्णधार स्टीव्ह स्मिथ, मार्नस लेबुशेन, अलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्रीन अशी फलंदाजांची भक्कम फळी त्यांच्याकडे आहे. भारताला महंमद शमी, महंद सिराज यांच्यासह हार्दिक पंड्या व अक्सर पटेलच्या गोलंदाजीवरही अवलंबून राहावे लागणार आहे. त्यातच कुलदीप यादवच्या जागी शार्दुल ठाकूर, उमरान मलिक किंवा यजुवेंद्र चहल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. फलंदाजीतही फार काही बदल होतील असे वाटत नाही.
लक्षवेधी…
– भारत पराभूत झाल्यास अव्वल स्थान गमावणार
– ऑस्ट्रेलियाला विजयासह क्रमवारीत अग्रस्थानाची संधी
– चेन्नईची खेळपट्टी फिरकीसाठी नंदनवन ठरेल
– पावसाच्या शक्यतेमुळे पूर्ण सामना होण्याबाबत संभ्रम
– सोमवारपासून चेन्नईत मुसळधार पाऊस कायम
सलग दोन सामन्यांत भोपळाही फोडता न आलेल्या सूर्यकुमारच्या जागी इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतासमोरचे सर्वात मोठे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा यशस्वी पणे सामना कसा करायचा हेच राहणार आहे. त्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल व पंड्या यांना जबाबदारीने फलंदाजी करावी लागेलच परंतू रवींद्र जडेजाकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा जास्त आहे.
Hockey India : स्टार खेळाडू राणी रामपाल हिचा ‘एका’ खास गोष्टीव्दारे सन्मान
कोहलीवरच जास्त मदार
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीने यंदाच्या मौसमात चांगल्या खेळी केल्या आहेत. मात्र, या मालिकेत अद्याप कोहलीची बॅट तळपलेली नाही. या दोन सामन्यांनंतरच्या ब्रेकमध्ये चेन्नईत दाखल झाल्यापासून कोहलीने दिवसातून दोन सत्रांमध्ये नेटमध्ये सराव केला आहे. अवे स्विंग व इन स्विंगर या चेंडूंवर तर त्याने कसून फलंदाजीचा सराव केला आहे. त्यामुळे या सामन्यासह ही मालिकाही भारतीय संघाला जिंकायची असेल तर कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी होणे गरजेचे आहे.