नवी दिल्ली – भारताला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करून महाशक्ती बनवण्यासाठी देशातील उद्योगक्षेत्राने आयात मालावर अवलंबून राहण्यापेक्षा भारतीय मालालाच प्राधान्य दिले पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की केवळ आयातीवरच अवलंबून असलेली उद्योगक्षेत्रे आपण हुकडून काढली पाहिजेत आणि त्या ठिकाणी देशी मालाच्या वापराचा आधार घेतला पाहिजे.
भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत बोलताना ते म्हणाले की, देशातील उद्योगांनी आता महानगरांच्या पलीकडे जाऊन देशाच्या ग्रामीण भागात उद्योगांचे नेटवर्क उभारण्याची गरज आहे. अति दुर्गम आणि आदिवासी भागाकडे यापूर्वी कोणाचेही लक्ष गेलेले नाही. तेथेही उद्योगक्षेत्राने लक्ष देण्याची गरज आहे.
देशातील सुमारे 90 टक्के मोठे उद्योग आज केवळ मोठी शहरे किंवा महानगरांमध्ये आहेत ही शोचनीय बाब आहे. पण आज देशाच्या मागास, दुर्गम आणि आदिवासी भागाचाही विकास होण्याची गरज आहे. तेथेही उद्योग पोहोचला पाहिजे.
चीन आज त्यांची जी एकूण निर्यात करतो त्यातील 70 टक्के निर्यात ही प्रामुख्याने दहा सेक्टरमध्ये आहे. हे सेक्टर कोणकोणते आहेत आणि त्यातून भारतात काय आयात केली जाते हे हुडकून काढून तेथे भारतीय मालाचा पुरवठा करण्यावर उद्योगक्षेत्राने लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले.
चीनच्या विविध क्षेत्रांतील निर्यातीची आकडेवारी देताना त्यांनी नमूद केले की आज चीन मशिनरी आणि इक्वीपमेंटची सुमारे 100 अब्ज डॉलर्सची निर्यात करतो, प्लॅस्टिक उत्पादनांची 84 अब्ज डॉलर्सची निर्यात करतो, वाहनांची 74.40 अब्ज डॉलर्सची निर्यात करतो, कपड्यांची 66.80 डॉलर्सची निर्यात करतो. याचा अभ्यास करून भारतीय उद्योग महासंघाने आपलीही निर्यात कशी वाढवता येईल आणि आयातीवरील अवलंबित्व कसे कमी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.