मावळ तालुक्यातील आंबी, वराळे परिसरात
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : जलचर प्राण्यांना धोका
इंदोरी –आंबी, वराळे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच काही गावातील दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने नदीला गटारगंगेचे स्वरुप आले आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यस धोकादायक झाले आहे. नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक व दूषित सांडपाणी रोखून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी, पवना, कुंडलिका, सुधा, आंद्रा या नद्यांचे पात्र पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. या नद्यांच्या पाण्यावर काठावरील अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्यानळपाणीपुरवठा योजना आहेत. परंतु सध्या या नद्यांचे पाणी दूषित झाले असून, जलचर, प्राणी आणि मानवी आरोग्यास धोकादायक ठरत आहे. याशिवाय औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणात वेगाने वाढ होत आहे.
कारखान्यातील रसायनमिश्रीत पाणी तसेच कचरा ओढे, नाल्यातून नदीपात्रात सोडले जाते. तसेच गावोगावचे गृहप्रकल्पाच्या दूषित सांडपाण्याचे व्यवस्थापन अथवा कोणतीही प्रक्रिया न करता सर्रासपणे नदीपात्रात सोडले जात आहे. तसेच नदीपात्रात कपडे, म्हशी, बैल, गायी व अन्य जनावरे धुतली जातात. देवाच्या पूजेचे साहित्य (निर्माल्य) पात्रात टाकले जाते.
मावळ तालुक्यात मुबलक पाणी असले तरी सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात पाणी सोडले जात असल्यामुळे पाणी दूषित होते. त्यामुळे मुबलक पाणी असूनही अस्वच्छ पाण्यामुळे नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे.
नद्यांच्या उगमांपासून पाणी प्रदूषणास सुरूवात होते. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व औद्योगिक कारखान्यांच्या पिण्याच्या पाण्याचे जोडलेल्या जलवाहिनीमुळे नदीपात्राजवळची स्थितील खूपच बिकट आहे. पाणी शुद्धीकरण केले तरी त्यातील रासायनिक घटक पाण्यातच असल्याने जलचर, प्राणी व मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे.