नवी दिल्ली : जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी लसनिर्मीतीसाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. तसेच काही देशांमध्ये लसीकरणालादेखील सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, भारतातदेखील लवकरच लसीकरणाला सुरूवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताने स्वदेशी बनावटीच्या तीन कंपन्यांच्या लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे सगळ्या जगाच लक्ष भारताकडे लागले आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला ऍस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी बोलसोनारो यांनी केली आहे. मात्र भारताने करोनासंदर्भातील जे धोरण तयार केले आहे. त्यानुसार सर्वात आधी भारत आपल्या शेजरच्या देशांना करोनाची लस देणार आहे. त्यानंतर जगभरातील इतर देशांमध्ये करोनाची लस पाठवली जाणार आहे तर दुसरीकडे भारतीय बनावटीच्या करोना लसींचे चीननेही कौतुक केले आहे. दक्षिण आशियातील आमच्या शेजारच्या देशांनी तयार केलेली करोना लस ही गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्याही लसीपेक्षा कमी नाहीय, असे चीनने म्हटले आहे.
दिवसोंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारताने करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांनी भारताकडे करोनाच्या लसीची मागणी केली आहे. भारत इतर देशांना करोनाच्या लसीचा पुरवठा करताना शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना भारत आधी लसींचा पुरवठा करणार असल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने म्हटले आहे.
भारतीय लसींचा दर्जा, गुणवत्ता आणि परिणामकारकता पाहता जगभरातून या लसींना मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच या पूर्णपणे मेड इन इंडिया लसींचे जगभरात वितरण करण्यासाठी भारत सज्ज झाला असून भारतातील लसीकरणाच्या पहिल्या काही टप्प्यांनंतर या लसींच्या निर्यातील संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच भारत हा करोना लसीकरणामध्ये जागतिक केंद्र होण्याची शक्यता आहे.