धुळे – राज्य सरकारकडून एक आगळा-वेगळा कार्यक्रम राज्यभर राबविला जात आहे. त्याआधी लाभार्थ्यांना सरकारकडे जावे लागत होते आणि हेलपाटे मारावे लागायचे. त्यावेळी काही लाभार्थ्यांचे ऐकले जायचे, तर काहींचे ऐकले जायचे नाही. यामुळे राज्य सरकारने “शासनच लोकांच्या दारी घेऊन जायचं.
त्यामधून ही कल्पना पुढे आली, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची घोडदौड सुरू आहे. अनेक प्रकारच्या योजना केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांना दिल्या जातात असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला.
अजित पवार म्हणाले, मुंबईत कार्यक्रम असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येऊ शकले नाहीत. या योजनांच्या माध्यमातून लाखो लाभार्थ्यांना घरबसल्या लाभ मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे.
या कार्यक्रमामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत नाही. योजनांची माहिती, त्यासाठी लागणारी कागदपत्रं यासाठी काही अडचण येणार नाही. या योजनेमुळे पैशांची आणि वेळेची बचत होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 हजार लाभार्थी निर्माण करायचे आहेत, हे सरकारचं लक्ष आहे.
दुसरीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे आपण कपाशीचे रोपण केले. परंतु अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतात प्रचंड पाऊस पडत आहे. एका दिवशी 6 इंच इतका पाऊस पडला. परंतु येथे आज आपण अद्यापही पावसाच्या विवेंचनेमध्ये आहे. मात्र, ही काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.