थिरूवनंतपूरम -भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केरळमधील ४ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर केली. विशेष म्हणजे, त्या मतदारसंघांत राहुल गांधी आणि शशी थरूर हे कॉंग्रेस नेते सध्या प्रतिनिधित्व करत असलेल्या वायनाड आणि थिरूवनंतपूरमचाही समावेश आहे. त्यामुळे प्रामुख्याने इंडियाच्या घटक पक्षांतच फाईट होणारे केरळ हे पंजाबनंतरचे दुसरे महत्वाचे राज्य ठरण्याची शक्यता आहे.
डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता असणाऱ्या केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागा आहेत. माकपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असणाऱ्या भाकपने त्यापैकी ४ मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले.
त्यानुसार, वायनाडमधून ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा, तर थिरूवनंतपूरममधून ज्येष्ठ नेते पन्नियन रविंद्रन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यातून कॉंग्रेसविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास डावे पक्ष सज्ज झाल्याचे मानले जात आहे.
विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या देशव्यापी आघाडीची स्थापना केली आहे. कॉंग्रेस आणि डावे पक्ष इंडियाचे घटक आहेत. मात्र, केरळमध्ये ते एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत.
त्या राज्यात कॉंग्रेस आणि डावे पक्षच एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. भाजप अद्याप त्या राज्यात राजकीय प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यामुळे केरळमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा मार्ग कॉंग्रेस आणि डावे पक्ष अवलंबणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
त्या राज्यात मागील लोकसभा निवडणुकीत (वर्ष २०१९) कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने दमदार कामगिरी करत १९ जागा जिंकल्या. तर, डाव्या आघाडीला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले.
केरळच्या आधी पंजाबमध्ये कॉंग्रेस आणि आप हे इंडियाचे घटक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले. पंजाबमध्येही भाजप लक्षणीय प्रभाव दाखवू शकलेला नाही. त्या राज्यात लोकसभेच्या १३ जागा आहेत.