पुणे – टीम इंडियाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा आज 32 वा वाढदिवस आहे. विराट कोहलीने आत्तापर्यंत यशस्वी कामगिरी केली आहे. त्याच्या अफलातून खेळीमुळे भारतीयांच्या मनामनात त्याने स्थान मिळवले आहे. भारतातूनच नाही तर जगभरातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विराटचा जन्म 5नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा झाला. चीकू हे विराटचे टोपणनाव आहे. रणजी सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने 2008 मध्ये भारतीय सघांत विराटला संधी मिळाली. त्यानंतर विराटने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक सामन्यामध्ये त्याचा खेळ सुधारतच गेला.
पहिल्यांदा त्याने टीम इंडियात आपली जागा पक्की केली. त्यानंतर धोनीचा उत्तराधिकारी झाला आणि आता त्याची तुलना सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजासोबत केली जात आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये अनुक्रमे 937, 911 आणि 897 सर्वोत्तम रेटिंग पॉईंटसह करिअरमध्ये कोहली अनेक विक्रम मोडीत काढत आहे. आक्रमक फलंदाजीद्वारे जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी पोहोचलेल्या विराटने भारताकडून 86 कसोटी, 248 एकदिवसीय आणि 82 टी-२० सामने खेळले आहेत.
विराटच्या 32 व्या वाढदिवसानिमित्त मागील पाच स्मरणीय आणि ऐतिहासिक खेळीवर एक नजर टाकूया…..
नाबाद 133 विरूध्द श्रीलंका, सीबी मालिका, 2012
ऑस्ट्रेलिया-श्रीलंका-भारत यांच्यात सीबी तिंरगी मालिका सुरू होती. हॉबर्टमध्ये शेजारी देश श्रीलंका सोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात जगाने पहिल्यांदा विराटची झलक पाहिली होती. कसोटी मालिका 0-4 ने गमावल्यानंतर या सामन्यातही भारताची अवस्था खराब होती. 37 षटकांच्या आताच भारताला 321 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. अशा कठिण परिस्थितीत विराटने मैदानात उतरत 82 चेंडूत 133 धावांची तूफानी खेळी केली होती. त्यावेळी सर्वात फार्मात असलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यांची चांगलीच धुलाई केली होती. त्याच्या एका षटकात कोहलीने 24 धावा काढल्या होत्या.
183 विरूद्द पाकिस्तान, 2012 ढाका, आशिया चषक
कोहलीने 2012 आशिया चषकाच्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात सर्वोच्च 183 धावांची खेळी केली होती. त्याने या खेळीत 22 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानचे 330 धावांचे आव्हान यशस्वीपणे पार केले होते. या सामन्यात भारताने शून्यावरच विकेट गमावली होती. गौतम गंभीर आउट होताच युवा विराट कोहली पुढे येत जबाबदारी घेत 183 धावा करत संघास विजय मिळवून दिला होता आणि कोहली सामनावीराचा मानकरी ठरला होता.
नाबाद 82 विरूध्द ऑस्ट्रेलिया,टी-20 विश्वचषक 2016
7 मार्च 2016 मध्ये विराटने आपल्या टी-20 करिअर मधील सर्वात संस्मरणीय खेळी केली होती. भारतात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून भारत सेमीफायनलमध्ये पोहचू शकत होता. टाॅस हरल्यानंतर विजयासाठी 161 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सुरुवातीच्या 6 षटकांत 37 धावांवर सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या विकेट गमावल्या होत्या. सुरेश रैना सुध्दा 10 धावा काढून माघारी परतला होता. त्यानंतर विराटने प्रथम युवराजच्या साथीनं डाव सावरला आणि नंतर स्वतच्या फलंदाजीच्या जोरावर भारताचा विजय निश्चित केला. कोहलीने या सामन्यात 51 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत भारतास 6 विकेटने विजय मिळवून दिला. दरम्यान, पुढील सामन्यात भारतीय संघाचा वेस्टइंडिजविरूध्द पराभव झाल्याने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते.
115 आणि 141 विरूध्द ऑस्ट्रेलिया,2014
कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीची अग्निपरीक्षा होती. दुखापतीमुळे धोनीच्या जागेवर संघाचे कर्णधारपद संभाळणाऱ्या विराटने ऑस्ट्रेलियाविरूध्द अॅडिलेड कसोटीच्या पहिल्या दोन डावात शतकं लगावले होती. कोहलीच्या 115 धावाच्या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 512 धावांच्या प्रत्युत्तरात 444 धावा बनवल्या होत्या. दुसरा डाव ऑस्ट्रेलियाने 5 बाद 290 वर घोषित करत भारतासमोर 362 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विराटने मुरली विजयसोबत चांगली भागिदारी केली आणि 141 धावा करत भारताची धावसंख्या 2 बाद 242 पर्यंत नेऊन ठेवली होती. येथून भारत विजय मिळवणार अस वाटत होते पण फिरकीपटू नाथन लियोनने 7 विकेट घेत भारताच्या आशा धुळीत मिळविल्या. भारताने 73 धावांतच पुढील 8 विकेट गमावल्या होत्या आणि भारताचा डाव 315 वर आटोपला होता.
149 विरुध्द इंग्लंड, बर्मिंघम,2018
2014 सालच्या दौऱ्यातील कटू आठवणीसोबत 2018 मध्ये भारतीय संघ पुन्हा एकदा इंग्लंड दौऱ्यावर आला होता. मागीलवेळी 13.50 अशा खराब सरासरीने फलंदाजी करणाऱ्या कोहलीला यावेळी स्वतला सिध्द करायचे आव्हान होते तसेच कर्णधार म्हणून सव्वा करोड भारतीयांच्या अपेक्षांचं ओझदेखील त्याला पेलायच होतं. भलेही भारतीय संघाने काही सामने अत्यंत कमी फरकाने गमावल्यानंतर मालिकासुध्दा 1-4 ने गमावली असली, तरी कोहलीच्या बॅटमधून धावा बरसल्या होत्या. ही एक चांगली गोष्ट होती. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत कोहलीने 59.30 च्या सरासरीने 593 धावा काढल्या होत्या.
पहिल्या कसोटीत भारताचे सर्व दिग्गज फलंदाज एका पाठोपाठ तबूंत परतत होते, तेव्हा जेम्स अॅडरसन आणि स्टुअर्ट ब्राॅड सारख्या खतरनाक गोलंदाजांच्या स्विंग होणाऱ्या चेंडूसमोर कोहलीने 149 धावांची खेळी केली. तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 97 तर दुसऱ्या डावात 103 धावा करत चांगला खेळ केला होता.
-स्वप्निल हजारे