शर्मिला जगताप
मुघल चित्रकला भारतीय चित्रकलेचा एक खास प्रकार आहे. सुरुवातीला पुस्तकांतील चित्रं अणि लघुचित्र या पुरतीच ही कला मर्यादित होती. मात्र, 16 व्या ते 19 व्या शतकांदरम्यान मुघल साम्राज्यात ही कला खऱ्या अर्थाने विस्तृत स्वरूपात पुढे आली.
मुघल चित्रकला ही भारतीय, फारसी आणि इस्लामी या तीन शैलींचे अद्वितीय मिश्रण आहे. आजही मुघल पेंटिंग सहज उबलब्ध होते. भारतीय मुघल चित्रकला इतर मुस्लीम देशांतही दळणवळणाद्वारे पोहोचले. त्यामुळे इतर मुस्लीम राष्ट्रांमध्येही आजही या कलेचा प्रसार झालेला दिसतो.
अकबराच्या शासनकाळात (1556-1605) भारतीय लघू चित्रकलेचे नवे युग सुरू झाले. फत्तेपूर सिक्री ही नवी राजधानी बनवल्यानंतर अकबराने या ठिकाणी भारतीय आणि फारसी कलाकारांना एकत्रित आणले. अकबराच्या दरबारी मीर सय्यद अली आणि अब्दुस समद हे दोन फारसी कलाकार होते. त्यांच्या देखरेखीखाली मुघल चित्रकलेला नवी पालवी फुटली आणि मुघल चित्रकला शैली खऱ्या अर्थाने जगासमोर आली.
आजही अकबराचे चित्र शालेय पाठ्यपुस्तकात सहज पाहायला मिळते. युद्ध करताना आणि शिकार करतानाचे चित्र काढले जात होते. कारण बादशहांना शक्ती प्रदर्शन करणारे साहसी चित्र खूपच आवडत असत. हुमायुँन बादशहानेही चित्रकलेला बराच वाव दिला. जहॉंगीर बादशहाच्या काळात दरबारी चित्रांसाठी प्रोत्साहन दिले गेले. त्याच्या दरबारातील सर्वात प्रतिभावंत चित्रकार म्हणजे उस्ताद मंसूर, अबुल हसन आणि बिंश्दस हे होते.
शाहजहॉंन बादशहा (1627-1658)च्या काळात चित्रकलेला संरक्षण दिले गेले. शाहजहॉंन स्वतः कलेचा भोक्ता होता. शाहजहॉंनने निर्माण केलेला ताजमहाल पाहताच त्याची कलेविषयी असलेली आवड आपल्या लक्षात येते. त्याच्या शासनकाळातील प्रसिद्ध चित्रकार मोहम्मद फैकीरुल्ला खान, मीर हाशिम, मुहम्मद नादिर, बिचिटर, चित्रमान, अनुपचतर, मनोहर आणि होनहर हे होते.
औरंगजेब बादशहाला ललित कलेविषयी रुची नव्हती. त्याच्या काळात अनेक कलाकार राजस्थान आणि दक्षिणेतील हैदराबादच्या हिंदू राज्यांच्या आश्रयाखाली स्थलांतरित झाले.