लीड्स – रोहित शर्मा आणि के एल राहुल यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषक स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळविला आहे. के एल राहुलने शानदार 111 धावा केल्या. 118 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावले तर रोहित शर्माने आपला विश्वचषक स्पर्धेतील फॉर्म कायम ठेवत 94 चेंडूत 103 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 2 षटकार लगावले.
India win by seven wickets and for the time being go top of the standings!
Will Australia overtake them?#SLvIND | #CWC19 | #TeamIndia pic.twitter.com/Y0AykFJnwV
— ICC (@ICC) July 6, 2019
भारताच्या विजयात कोहली यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. विराट कोहलीने 34 धावा केल्या. तर ऋषभ पंत 4 धावा काढून माघारी परतला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने विजयासाठी आवश्यक धावा 43.3 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा, कसुन राजिथा आणि इसुरू उदाना यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी स्विकारली होती. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अँजेलो मॅथ्यूजच्या शतकी आणि लाहिरू थिरिमाने याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 264 धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजने 128 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 113 धावांची खेळी केली तर लाहिरू थिरिमाने याने 53 धावा करत त्याला मोलाची साथ दिली.
भारतीय संघाकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 10 षटकांत 37 धावा देत 3 गडी बाद केले. तसेच बुमराहने एकदिवसीय कारकीर्दीत 100 गडी बाद करण्याचा देखील आकडा पूर्ण केला. हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.