नवी दिल्ली – भारताला आपला मार्ग निवडण्यासाठी कोणत्या राष्ट्राच्या मंजुरीची गरज नाही तसेच भारत त्यासाठी कोणाची दुय्यम सावली होणार नाही अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या अलिप्ततावादी परराष्ट्र नितीचा पुनरूच्चार केला. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाच्या बाबत कडक धोरण घ्यावे अशा आशयाची पाश्चिमात्या देशांची आणि अमेरिकेची थेट मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.
थिंक टॅंक ओआरएफ आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रायसिना डायलॉग या कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले की जो जसा आहे, त्याने तशाच प्रकारे जगासोबत काम केले पाहिजे. कोणाची दुय्यम सावली बनून काम करता कामा नये. कोणी दिलेल्या ओळखीमुळे आपले अस्तित्व आहे आणि त्यांच्या मंजुरीची आपल्याला आवश्यकता आहे, असे मानणे तुमची ओळखच नष्ट करून टाकेल.
गेल्या काही काळात भारताचे अमेरिका आणि अन्य काही देशांसोबत बऱ्याच विषयांवर मतभेद झाले आहेत. त्यात आपल्या देशाची इंधनाची गरज भागविण्यासाठी रशियाकडून आयातीचा निर्णय असो, रशियाकडून आपल्या सामरिक गरजा पूर्ण करण्यासाठी एस-400 क्षेपणास्त्र कवच प्रणाली घेण्याचा निर्णय असो अथवा रशिया युक्रेन संघर्षात घेतलेली भूमिका असो, हे मतभेद अधोरेखित झाले आहे व भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्नही झाला. मात्र भारताने आपले अलिप्त धोरण कायम राखण्याला प्राधान्य दिले. जयशंकर यांची आजची प्रतिक्रिया तेच सूचित करते आहे.
भारतातील कथित धार्मिक संघर्ष अथवा धार्मिक स्वातंत्र्य नसल्याबद्दल विदेशी माध्यमांतून बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांचा भारताकडून वारंवार इन्कार करण्यात आला आहे. आताही परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य हेच सूचित करते की भारताबद्दल कोण काय बोलते याला आम्ही महत्व देत नाही. तर आमच्या देशाच्या हितासाठी आवश्यक असलेली भूमिका ठामपणे मांडण्यास आम्ही सक्षम आहोत.
काही दिवसांपूर्वी युरोपातील राष्ट्रांनी भूमिका मांडली होती. जे युक्रेनमध्ये घडले आहे, तो धोक्याचा इशारा असल्याचे त्यांनी म्हटले होते.
त्यावेळीही जयशंकर यांनी भारताची बाजू जोरकसपणे मांडली होती. जे आज युक्रेनमध्ये होते ते गेल्या दशकात आशियातही घडले आहे. कदाचित त्यावेळी त्यांचे याकडे लक्ष गेले नसेल. येथे देशांच्या सीमा निश्चित नाही. लोक दहशतवादाला खतपाणी घालतात, आश्रय देतात. अफगाणिस्तानात जे घडले ते योग्य होते का, संपूर्ण नागरी समाजाला मरण्यासाठी तेथे सोडून देण्यात आले अशा कठोर शब्दांत त्यांनी भारताला सल्ला देणाऱ्यांना आरसा दाखवला होता.