Air pollution in India : भारतातील वाढते वायू प्रदूषण आता केवळ पर्यावरणाचा प्रश्न उरला नसून, ते देशातील सर्वात मोठे आरोग्य संकट बनले आहे. ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या एका इशाऱ्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. वायू प्रदूषणामुळे भारतासमोर कोरोनापेक्षाही कित्येक पट मोठी महामारी उभी ठाकली असून, उत्तर भारतातील लाखो लोकांची फुफ्फुसे आधीच निकामी होण्याच्या मार्गावर असल्याचा धक्कादायक दावा डॉक्टरांनी केला आहे. तज्ज्ञांचे काय आहे म्हणणे? लिव्हरपूलमधील फुफ्फुस रोगतज्ञ डॉ. मनीष गौतम यांच्या मते, उत्तर भारतातील विषारी हवेमुळे लाखो लोकांच्या फुफ्फुसांना गंभीर इजा झाली आहे. ते म्हणतात, “ज्याप्रमाणे आपण क्षयरोगाविरुद्ध (TB) युद्धपातळीवर मोहीम राबवली, तशीच मोहीम आता फुफ्फुसांच्या आजारांसाठी राबवण्याची गरज आहे.” वायू प्रदूषण ही एक ‘सायलेंट किलर’ महासाथ असून ती हळूहळू संपूर्ण पिढीला पोखरत आहे. रुग्णालयांत २० ते ३० टक्के वाढ : डिसेंबर महिन्यात दिल्ली आणि आसपासच्या भागातील श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यात तरुणांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ‘वारंवार होणारी डोकेदुखी आणि हलका खोकला. आणि घसा खवखवणे आणि डोळे कोरडे पडणे’. लोक या लक्षणांकडे किरकोळ समजून दुर्लक्ष करतात, मात्र हा फुफ्फुसे खराब होण्याचा सुरुवातीचा टप्पा असू शकतो. हृदयविकाराचाही वाढता धोका : बर्मिंगहॅम येथील हृदयरोगतज्ञ प्रोफेसर डेरेक कॉनोली यांनी स्पष्ट केले की, हवेतील अतिसूक्ष्म कण (PM 2.5) डोळ्यांना दिसत नाहीत, पण ते थेट रक्ताभिसरण प्रक्रियेत मिसळून हृदयविकाराला निमंत्रण देतात. प्रदूषणाचा हा परिणाम हळूहळू पण अत्यंत जीवघेणा ठरतो. वाहतूक क्षेत्र जबाबदार : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही ही वस्तुस्थिती मान्य केली आहे की, दिल्लीसारख्या शहरांमधील एकूण प्रदूषणापैकी सुमारे ४० टक्के प्रदूषण हे केवळ वाहतूक क्षेत्रामुळे होत आहे. जर तातडीने कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. दिल्ली आणि मुंबईत हवा ‘आरोग्यासाठी घातक’ श्रेणीत पोहोचली आहे. आताच उपाययोजना न केल्यास भारत एका अशा महामारीच्या उंबरठ्यावर उभा असेल, जिथे ऑक्सिजन सिलेंडर ही गरज नसून हतबलता असेल.