नवी दिल्ली – भारत 2047 पर्यंत जागतिक विकासाला चालना देणारे पॉवरहाऊस बनण्याच्या मार्गावर आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियातल्या व्यावसायिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आपल्या भाषणात, गोयल म्हणाले की भारत प्रशांत क्षेत्र आर्थिक आराखडा म्हणजे, नियमावर चालणारी आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था आणि पारदर्शक आर्थिक व्यवस्था राखणे हे समान उद्दिष्ट बाळगणाऱ्या समविचारी देशांसोबत मुक्त आणि निष्पक्ष व्यापारासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा, मैलाचा दगड आहे, इंडो-पॅसिफिकमधील राजकीयदृष्ट्या स्थिर आणि खुल्या अर्थव्यवस्था, परस्परांमध्ये आर्थिक उलाढालींचा विस्तार करण्यासाठी एकत्र येत आहेत, असेही ते म्हणाले.
भारतात होत असलेल्या प्रगतिकारक सुधारणा आणि विकास कामांमुळे, देशाने जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे. गेल्या काही वर्षांत झालेले मूलभूत बदल आणि संरचनात्मक सुधारणांच्या परिणामांचे मूल्यमापन करत गोयल यांनी नमूद केले की, 2047 या वर्षात भारताची अर्थव्यवस्था 35 ते 45 ट्रिलियन म्हणजेच 35 ते 45 लाख कोटी डॉलर्सची असेल आणि ती भारताला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसवेल, असे उखख (भारतीय औद्योगिक महासंघ)चे अनुमान आहे.
भारत संधीचे आगार आहे –
भारत आज संधींचे आगार आहे आणि अमेरिकेतल्या व्यापारी समुदायासाठी एक संभाव्य बाजारपेठ आहे, असे ठासून सांगत त्यांनी नमूद केले की, भारताला लोकसंख्याशास्त्राच्या दृष्टीने लाभलेल्या मनुष्यबळाचा लाभ होत आहे आणि भारतातली महत्त्वाकांक्षी तरुणाई विकासाच्या वाढीसाठी मोठी संधी प्रदान करते. गोयल यांनी असेही सांगितले की, भारत देखील स्वच्छ , प्रदूषणरहित ऊर्जा प्राप्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि 2030 वर्षा पर्यंत 500 गिगावॅट हरित ऊर्जा निर्मितीची क्षमता गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही गोयल म्हणाले.