India – South Korea: भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकट करण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग सध्या भारत दौऱ्यावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर दोन्ही देशांनी तंत्रज्ञान, जहाजबांधणी, ऊर्जा आणि मनोरंजन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ करारांवर स्वाक्षऱ्या – या ऐतिहासिक भेटीदरम्यान एकूण १५ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, ‘विशेष धोरणात्मक भागीदारी’साठी संयुक्त धोरणात्मक दृष्टीकोन जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी आर्थिक सुरक्षा संवाद सुरू करण्याची घोषणा केली असून, सागरी वारसा आणि बंदर विकास क्षेत्रातील सहकार्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, दक्षिण कोरियाने ‘इंडो पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह’ आणि ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, तर भारत ‘ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट’मध्ये सहभागी होणार आहे. भारत-दक्षिण कोरिया मैत्री वर्ष- या मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सन २०२८-२९ हे वर्ष ‘भारत-दक्षिण कोरिया मैत्री वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला आहे. यासोबतच, दोन्ही देशांमधील व्यापार अधिक सुलभ करण्यासाठी ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारा’च्या (CEPA) नूतनीकरणावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात 35 टक्क्यांची भरघोस वाढ संरक्षण क्षेत्रातील वाढत्या सहकार्याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) पी. कुमारन यांनी सांगितले की, भारत आता दक्षिण कोरियाकडून केवळ शस्त्रास्त्रांची खरेदी न करता, सह-विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर लक्ष केंद्रित करत आहे. ‘के-९ वज्र’ यंत्रणा आणि विमानविरोधी तोफांच्या पुरवठ्यानंतर, आता पुढील टप्प्यात प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात दोन्ही देश एकत्र काम करतील. जागतिक स्तरावर रशिया-युक्रेन युद्ध आणि आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी व्यक्त केले. तसेच, कोरिया द्वीपकल्पाच्या अण्वस्त्रीकरणाला भारताने दिलेल्या पाठिंब्याचे त्यांनी स्वागत केले. भारतातील जहाजबांधणी केंद्रांचे आधुनिकीकरण – जहाजबांधणी आणि सागरी लॉजिस्टिक्स क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर नेण्यासाठी दक्षिण कोरिया मोठी गुंतवणूक करणार आहे. एचडी कोरिया शिपबिल्डिंग अँड ऑफशोअर इंजिनिअरिंग या कंपनीसोबत झालेल्या करारानुसार, भारतातील जहाजबांधणी केंद्रांचे आधुनिकीकरण केले जाईल. यामध्ये मोठ्या जहाजांच्या बांधणीसाठी नवीन ड्राय डॉकची निर्मिती, ब्लॉक फॅब्रिकेशन सुविधा आणि कामगारांच्या कौशल्य विकासाचा समावेश आहे. तसेच, दोन्ही देश मिळून स्वायत्त सागरी क्रेन आणि बंदर पायाभूत सुविधांचे डिझाइन व निर्मिती करणार आहेत. यासाठी विशेष ‘मॅरिटाइम डेव्हलपमेंट फंड’चा वापर केला जाणार असून, यामुळे भारताच्या सागरी व्यापाराला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.