नवी दिल्ली | भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक स्तरावर एक मोठी ऐतिहासिक झेप घेतली असून जपानला मागे टाकत भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. २९ डिसेंबर २०२५ रोजी केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, भारताच्या जीडीपीचा (GDP) आकार आता ४.१८ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ३५० लाख कोटी रुपये) इतका झाला आहे. सध्याच्या वेगवान विकासदरामुळे भारत लवकरच जर्मनीलाही मागे टाकेल आणि २०३० पर्यंत ७.३ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ६१० लाख कोटी रुपये) जीडीपीसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. सध्या अमेरिका आणि चीन हे देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. भारताच्या या नेत्रदीपक वाढीमागे देशांतर्गत भक्कम मागणी आणि विशेषतः खाजगी उपभोगाचा मोठा वाटा असल्याचे सरकारने म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जीडीपी दर ८.२% वर पोहोचला असून, तो गेल्या सहा तिमाहींमधील उच्चांकी स्तर आहे. जागतिक व्यापारात अनिश्चितता असूनही भारताने आपली लवचिकता सिद्ध केली आहे. महागाईचा दर मर्यादेच्या आत राहणे, बेरोजगारीच्या दरात झालेली घट आणि निर्यातीमधील सुधारणा ही या आर्थिक प्रगतीची महत्त्वाची लक्षणे आहेत. तसेच व्यावसायिक क्षेत्राला होणारा पतपुरवठा आणि शहरी भागातील वाढता उपभोग यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली आहे. भारताच्या या आर्थिक घोडदौडीची जागतिक संस्थांनीही दखल घेतली आहे. विश्व बँकेने २०२६ साठी ६.५% विकासदराचा अंदाज वर्तवला आहे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) २०२५ साठी आपला अंदाज ६.६% पर्यंत वाढवला आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) भारताचा २०२५ चा विकासदर ७.२% राहील असे म्हटले आहे. ‘मूडिज’ आणि ‘फिच’ सारख्या संस्थांच्या मते भारत ही जी-२० देशांमधील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली असून, आगामी काळातही हा वेग कायम राहण्याचे संकेत दिले आहेत.