नवी दिल्ली – परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या संदर्भात वक्तव्य करताना अत्यंत कठोर भाषेचा वापर केला आहे. सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की भारत आता दुसरा गाल पुढे करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हापासूनच आम्ही दहशतवादाचा सामना करत आलो आहोत. तेंव्हाही तथाकथित हल्लेखोर पाकिस्तानातून आले होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पहिल्या दिवसापासून आम्ही अशा हल्ल्यांचा मुकाबला करत असून ही एक अशी गोष्ट आहे की ज्याबाबत आम्हाला आता स्पष्ट व्हावे लागेल.
मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्याचा संदर्भ देताना ते म्हणाले की, भारतात काय बदलले आहे असे विचारले तर मी सांगेन २६/११ ची घटना टर्निंग पॉइंट होती. त्या अगोदर लोक एका भ्रमात होते. आता आपल्याला सगळ्यांत पहिले काय करण्याची आवश्यकता आहे तर ती सामना करण्याची आवश्यकता आहे. कोणी मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याची पध्दत आता चालणार नाही. कोणी सीमेपलिकडून दहशतवादाची तयारी करत असेल तर त्याचे तुम्हाला उत्तर द्यावे लागेल.
जम्मू काश्मीरच्या पुंछ भागात लष्कराच्या वाहनावर गुरूवारी दहशतवादी हल्ला झाला. त्यात लष्कराचे ४ जवान शहीद झाले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर जयशंकर बोलत होते.विशेष म्हणजे विदेशी माध्यमांसमोर त्यांनी भारताची रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे.