पुणे – “कृषी क्षेत्रात आज सर्वाधिक गरज आहे, ती कृषीतज्ज्ञांची (ऍग्री टेक्नोक्रॅट्स). त्यासाठी आपल्याला कृषी विद्यार्थ्यांचे त्यादृष्टीने संगोपन करावे लागेल. माजी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन कृषीरत्न अनिलतात्या मेहेर यांनी केले.
पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या 35 व्या वर्धापन दिन सोहळ्यात अनिल तात्या मेहेर यांचा कृषी जीवन गौरव पुरस्काराने, तर चोरडिया उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रदीप चोरडिया यांचा कृषी सन्मान पुरस्काराने पुणे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील मासाळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी साखर आयुक्त आणि संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड हे होते.
शिरनामे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मेहेर म्हणाले, “नवीन विद्यार्थ्यांमधून टेक्नोक्रॅट्स घडवतानाच कृषी क्षेत्रात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढविला पाहिजे. त्यासाठी अभ्यासक्रमात बदल व्हावेत. आज सोयाबीन, कापसाच्या किमती अमेरिकेसारखे देश ठरवतात. जगात दूध पावडरचे उत्पादन किती झाले यावर दुधाचे दरही ठरतात, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. हे बदलायचे असेल तर शेतकऱ्यांना “व्हीजन’ देण्याची गरज आहे.’ चोरडिया यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देतानाच कॉर्पोरेट शेतीबाबत नव्या पिढीने काही ठोस विचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी “गोकूळ दूध’ चे कार्यकारी संचालक अरुण नरके यांनीही मनोगत व्यक्त केले. समारोपात शेखर गायकवाड यांनी माजी विद्यार्थी संघटनेने हाती घेतलेल्या कार्यक्रमाचा सविस्तर पटच मांडला. खुमासदार शैलीत त्यांनी भावकीचे वाद, जमीन खरेदी-विक्रीतील घोटाळ्यांवर टिपण्णी करतानाच, कृषी पदवीधरांनी नव्या शतकामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. सूत्रसंचालन विठ्ठल शिर्के यांनी, तर आभार सर्जेराव जेधे यांनी केले. कार्यक्रमास 1960 पासूनचे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.