India Defence: देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे २.३८ लाख कोटी रुपयांच्या शस्त्रसामग्री खरेदीला मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार भारतीय हवाई दलाला नवी ट्रान्सपोर्ट विमानं, S-400 क्षेपणास्त्र प्रणाली, तसेच ड्रोन मिळणार आहेत. याशिवाय सु-३० लढाऊ विमानांचे इंजिन दुरुस्त करून त्यांची क्षमता वाढवली जाणार आहे. सध्या वापरात असलेली जुनी AN-32 आणि IL-76 विमानं बदलून नवी विमानं घेतली जाणार आहेत. त्यामुळे सैन्याला सैनिक आणि साहित्य वेगाने हलवणे सोपे होईल. S-400 प्रणालीमुळे शत्रूचे हवाई हल्ले लांबूनच रोखता येतील. ड्रोनमुळे गुप्त माहिती गोळा करणे आणि हल्ले करणे अधिक सोपे होणार आहे. एकूणच, या निर्णयामुळे भारताची संरक्षण ताकद आणखी वाढणार आहे.