बिजींग: भारत आणि चीन यांनी एकमेकांच्या समस्या ध्यानात घेऊन परस्परांविषयी सन्मानाची भावना बाळगावी आणि त्यातून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी सुचना भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भारत आणि चीन हे अशियातील दोन महत्वाचे आणि मोठे देश आहेत आणि त्यांच्यातील संबंधांचे जागतिक स्तरावर पडसाद उमटत असतात.
जयशंकर हे सोमवार पासून तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आले असून त्यांचा दौरा आज समाप्त झाला. आपल्या भेटीत त्यांनी चीनचे उपाध्यक्ष वांग किशान यांच्याशी चर्चा केली. एका चिनी सरकारी वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की जागतिक स्थिती आता बदलत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन यांनी आपसातील संपर्क आणि सहकार्य वाढवून जागतिक शांतता, स्थैर्य आणि विकासाला पूरक भूमिका बजावली पाहिजे. या दोन्ही देशांना मोठा इतिहास आहे.
मानवी नागरीजीवनाची पार्श्वभूमीही या दोन्ही देशांना मोठी लाभली असून पुर्वेकडील सिव्हीलायझेशन चे हे दोन देश मोठा आधार आहेत. दोन्ही देशांतील संस्कृतीचा एकमेकांवर मोठा प्रभाव असतो त्यामुळे हे सांस्कृतिक बंध अधिक घट्ट कसे होतील याकडेही दोन्ही देशांनी लक्ष देण्याची गरज आहे.