Ebola virus: अफ्रिका खंडात वाढत असलेल्या इबोला विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारत-अफ्रिका फोरम शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकार आणि आफ्रिकन युनियन यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. भारताच्या यजमानपदाखाली 28 ते 31 मे 2026 दरम्यान नवी दिल्लीत चौथ्या भारत-अफ्रिका फोरम शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार होते. या परिषदेत अफ्रिका खंडातील विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होणार होते. भारत-अफ्रिका संबंध अधिक दृढ करणे तसेच व्यापार, आरोग्य, तंत्रज्ञान आणि विकास सहकार्याचा नवा रोडमॅप तयार करणे हा परिषदेचा उद्देश होता. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “परिषद आणि संबंधित बैठकींच्या नव्या तारखा परस्पर सल्लामसलतीनंतर निश्चित करण्यात येतील आणि योग्य वेळी जाहीर केल्या जातील.” विशेष म्हणजे, ही परिषद तब्बल दहा वर्षांनंतर आयोजित होणार होती. यापूर्वी भारत-अफ्रिका फोरम शिखर परिषद 2008, 2011 आणि 2015 मध्ये पार पडली होती. विशेष आरोग्य सल्ला जारी – दरम्यान, केंद्र सरकारने इबोलाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर उच्च जोखमीच्या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी बंदरे, विमानतळे आणि सीमावर्ती तपासणी केंद्रांवर विशेष आरोग्य सल्ला जारी केला आहे. परिषदेत सुमारे 40 देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार होते. त्यापैकी काही देशांना इबोला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उच्च जोखीम श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आफ्रिकन युनियनसोबतच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “अफ्रिकी नेते आणि हितधारकांचा पूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तसेच खंडातील उद्भवलेल्या सार्वजनिक आरोग्य परिस्थितीचा विचार करून परिषद पुढे ढकलण्याबाबत चर्चा करण्यात आली.” भारताने आफ्रिकेतील नागरिक आणि सरकारांसोबत एकात्मता व्यक्त करत आरोग्यविषयक संकटावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सहकार्याची तयारी दर्शविली आहे. भारतात अद्याप एकही रुग्ण नाही, दिल्ली विमानतळावर आरोग्य सतर्कता : केंद्र सरकार आफ्रिकेतील इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष आरोग्य सल्ला जारी करण्यात आला आहे. काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमधून येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताप, उलटी, जुलाब, घशात वेदना अथवा रक्तस्रावाची लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इबोला बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले. कोणत्या देशात किती रुग्ण ? आफ्रिकेत सध्या इबोला विषाणूच्या एका दुर्मिळ अशा ‘बंदीबुग्यो’ (Bundibugyo strain) या प्रकाराचा उद्रेक झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आणीबाणी (PHEic) घोषित केली आहे. काँगो हा देश या साथीचा मुख्य केंद्रबिंदू आहे. येथील ‘इतुरी’ (Ituri) प्रांतातून या आजाराची सुरुवात झाली असून तो आता इतर भागांतही पसरत आहे. निश्चित (Lab-Confirmed) रुग्ण: सुमारे ३० ते ५१ संशयित (Suspected) रुग्ण: ६५० पेक्षा जास्त मृत्यू: १४० हून अधिक लोकांचा संशयित मृत्यू झाला आहे (यात काही आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे). दरम्यान, काँगोमधून प्रवास करून आलेल्या नागरिकांमुळे युगांडामध्येही हा संसर्ग पोहोचला आहे. युगांडाची राजधानी ‘कंपाला’ (Kampala) येथे हे रुग्ण नोंदवले गेले आहेत. निश्चित (Lab-Confirmed) रुग्ण: २ (यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे). आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्यक्ष रुग्णांची संख्या सध्या समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा खूप जास्त असू शकते. महत्त्वाचे म्हणजे, इबोलाच्या या विशिष्ट ‘बंदीबुग्यो’ स्ट्रेनवर सध्या कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा अचूक औषध उपलब्ध नसल्यामुळे हा धोका अधिक वाढला आहे. इबोलाच्या मुख्य लक्षणांमध्ये तीव्र ताप, अंगदुखी, अशक्तपणा, उलट्या, जुलाब आणि अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्राव (Bleeding) होणे यांचा समावेश होतो.