प्रभात वृत्तसेवा इंदापूर – उजनी धरण प्रकल्पामुळे बाधित कांदलगाव, हिंगणगाव आणि तरडगाव येथील शेतकरी बांधवांनी आपल्या प्रश्नासाठी थेट सत्ताधार्यांकडे धाव घेतली. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख संजयभैय्या सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले. प्रकल्पासाठी संपादित जमिनींच्या मोबदल्याचा प्रश्न, पुनर्वसन आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या हक्कांबाबत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. विषयाची दखल घेत कृषिमंत्री भरणे यांनी तात्काळ हा प्रश्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यापर्यंत पोहोचविल्याचे स्पष्ट केले. सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे निर्णय प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषिमंत्री भरणे यांनी, उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय नक्की मिळेल, असे आश्वासन दिले. या भूमिकेमुळे शेतकरी बांधवांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, हा प्रश्न लवकरच सकारात्मकरित्या सुटेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. “उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ स्थानिक नसून राज्यस्तरीय गांभीर्याचा विषय आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हेच हा प्रश्न राज्यस्तरावरून मार्गी लावतील, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. दत्तामामांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल.” – अभिजीत तांबिले, माजी जि. प. सदस्य