India vs England 1st Test : हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा इंग्लंडविरुद्ध 28 धावांनी पराभव झाला. जवळपास तीन दिवस मॅचमध्ये वर्चस्व असलेल्या टीम इंडियाने अनेक मोठ्या चुका केल्या ज्यामुळे ते बॅकफूटवर गेले आणि चौथ्या दिवशीच इंग्लिश टीमने बाजी मारली. पण टीम इंडियाने कोणत्या चुका केल्या ज्यामुळे त्यांना जिंकलेला सामना गमवावा लागला? तर आम्ही तुम्हाला भारताच्या पराभवाची पाच मोठी कारणे सांगणार आहोत…
A special spell from Tom Hartley leads England to an extraordinary win in the opening Test against India 👏#WTC25 | 📝 #INDvENG: https://t.co/E53vcqjfHE pic.twitter.com/qoJl3biFfu
— ICC (@ICC) January 28, 2024
1 : रोहित शर्माने गमावला टाॅस …
भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटीत नाणेफेक खूप महत्त्वाची असते. इथल्या खेळपट्ट्यांवर पहिल्याच दिवसापासून फिरकीपटूंना वळण (टर्न) मिळू लागते आणि जसजशी स्पर्धा वाढत जाते तसतशी खेळपट्टीवर फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी करणे कठीण होते. अशा परिस्थितीत रोहित शर्माने नाणेफेक गमावणे हे देखील पराभवाचे प्रमुख कारण होते, कारण इंग्लंडने नाणेफेक जिंकून नव्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी केली.
2 : ओली पोपचा झेल चुकला
जवळपास सामन्यातून बाहेर पडलेल्या इंग्लंडला ओली पोपने जीवदान दिले. पोपने 196 धावांची इनिंग खेळून इंग्लिश संघाला स्पर्धेत परत आणले. मात्र अक्षर पटेलने पोपला झेलबाद केले असते तर तो एवढी मोठी खेळी खेळू शकला नसता आणि कदाचित भारताने सामना जिंकला असता. वास्तविक, जेव्हा ऑली पोप 110 धावांवर होता, तेव्हा अक्षर पटेलने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर ऑली पोपचा झेल सोडला होता.
3 : फलंदाजीच्या क्रमात अचानक बदल
दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजीच्या क्रमात अचानक बदल झाले. वास्तविक, खालच्या क्रमाकांवर फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलला डावखुरा फलंदाज म्हणून दुसऱ्या डावात पाचव्या क्रमांकावर खेळण्यास उतरवण्यात आले, जो पहिल्या डावात 9व्या क्रमांकावर खेळण्यास आला होता. डावखुऱ्या फलंदाजालाच वर पाठवायचे असते तर आधीच्या डावात 87 धावा करणाऱ्या जडेजाला पाठवता आले असते. अक्षर वर आल्याने श्रेयस अय्यरला खाली यावे लागले आणि तोही फ्लॉप झाला. अय्यर याला पदावनत(खालच्या क्रमाकांवर फलंदाजीस पाठवणे) करण्यात काही अर्थ नव्हता.
4 : तिसऱ्या क्रमांकावर विश्वासार्ह फलंदाज नसणे
भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी शुभमन गिलने घेतली. गिल दोन्ही डावात फ्लॉप ठरला. पहिल्या डावात त्याने 23 धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर विश्वासार्ह फलंदाज नसल्यामुळे भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पुजारासारखे फलंदाज भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर लांब डाव खेळायचे किंवा विकेट पडू देत नाहीत. मात्र सध्या तो संघाबाहेर आहे. स्टार व अनुभवी फलंदाज विराट कोहलीची कमी याठिकाणी जाणवली.
5 : फिरकीच्या स्वतःच्याच जाळ्यात अडकणे
भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटींमध्ये खेळपट्टी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. भारतीय खेळपट्ट्यांवर पहिल्याच दिवसापासून फिरकीपटूंना वळण (टर्न) मिळू लागते, जे दोन्ही संघांसाठी कठीण होते. पण यावेळी फिरकीला अनुकूल खेळपट्टीमुळे भारताचे नुकसान झाले. पूर्णपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टी कसोटीच्या दृष्टिकोनातून चांगली असू शकत नाही.