पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून खबरदारीचा उपाय म्हणून पवित्र पोर्टलद्वारे सुरु असलेल्या शिक्षक भरतीची प्रकिया 31 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. त्याबाबतच्या सूचनाही पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
शिक्षण विभागाने मुलाखतीशिवाय पद भरती व मुलाखतीसह पद भरतीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वेगाने कामकाज करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र यात सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. करोनामुळे सध्यस्थितीत भरतीची कार्यवाही करता येत नाही. दरम्यान परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील महिन्यात योग्य निर्णय घेण्यात येईल. मुलाखतीशिवाय पदभरतीच्या 9 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर विषयनिहाय, प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेली पदे, गैरहजर उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे, उमेदवार अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठीची निवड प्रक्रिया प्रथम करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती कार्यवाही नंतर पूर्ण करण्यात येणार आहे.
मुलाखतीसह पद भरतीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना नियमानुसार खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत. ज्या उमेदवारांना यापूर्वी इयत्ता ११ वी ते १२ वी च्या गटासाठी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत परंतु असे उमेदवार पदव्युतर पदवी किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत. खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेले होती . त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पद भरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत त्यांना तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देता येणार आहेत.
उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावयाचे आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही, असे उमेदवारांना सूचित करण्यात आलेले आहे.