नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ अरविंद केजरीवाल (दिल्ली) आणि भगवंत मान (पंजाब) हे मुख्यमंत्रीही निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या बैठकीपासून दूर राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
निती आयोगाची बैठक उद्या (शनिवार) दिल्लीत होणार आहे. मात्र, त्या बैठकीवर केंद्र आणि राज्य सरकारांमधील संघर्षाचे सावट पसरले आहे. ममता बैठकीला दांडी मारणार असल्याची माहिती याआधी पुढे आली. आता केजरीवाल यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून बैठकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे कळवले. त्यासाठी त्यांनी मोदी सरकारच्या अध्यादेशाचे कारण पुढे केले.
दिल्लीतील सेवांच्या नियंत्रणाशी संबंधित अध्यादेशावरून सध्या मोदी आणि केजरीवाल सरकारांमध्ये संघर्ष सुरू आहे. देशातील सहकार्यावर आधारलेल्या संघराज्यीय रचनेचे रूपांतर विनोदात झाले आहे, अशी नाराजीही केजरीवाल यांनी पत्रातून व्यक्त केली.
निधी वाटपावरून मोदी सरकार पंजाबशी भेदभाव करत असल्याचा आरोप करत मान यांनी निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले. ती बैठक मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.