खालापूर – मोगलवाडी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदीराचा गाभारा आणि कलश बसविला आहे. तर नगरविकास वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मंदीरासाठी सभामंडप बांधण्यात आले आहे. या सभामंडपाचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी पंकज पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील, माजी नगरसेवक मोहन औसरमल, राजू गायकवाड, किशोर पानसरे, अमोल जाधव, माजी नगरसेविका अश्विनी पाटील, रूपाली जाधव, प्रिया जाधव, माणकिवलीचे उपसरपंच संजय देशमुख, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, भाजप महिला पदाधिकारी अश्विनी आत्रे, निवृत्त मुख्य अभियंता अशोक पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मोगलवाडीतील दत्तमंदीर ४० वर्षापूर्वी बांधले होते. मंदीर जीर्ण झाल्यानंतर मंदीर उभारणीसाठी गावातील प्रतिष्ठीत लोकांनी एकत्रित येत मंदीराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरविले. त्यासाठी निधीची मोठी अडचण निर्माण झाली. शहरप्रमुख संदीप पाटील यांच्या माध्यमातून आ. थोरवे यांनी सभा मंडपासाठी १६ लाख निधी उपलब्ध करून दिला. मिळालेल्या निधीतून स्लँबपर्यत काम झाले. पुढील कामासाठी निधी कमी पडत असल्याने सर्वजन चिंतेत असताना उपसरपंच संजय देशमुख, माजी नगरसेवक राजू गायकवाड यांच्या प्रयत्नातून आ.थोरवे यांनी पुन्हा २५ लाख असा एकूण ४१ लाख रूपयाच्या निधी दिला. यातून मंदीराचा सुंदर सभामंडप उभारला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी अनुप दुरे, मुख्य अभियंता वाणी यांनीही सातत्याने पाठपुरावा केला आहे. ठेकेदार विक्रांत गायकवाड यांनी उत्कृष्ट बांधकाम केल्याची माहिती राजेंद्र म्हात्रे यांनी प्रास्ताविकातून दिली.
सभामंडपाचा लोकार्पण सोहळा थोरवे कुटूंबाच्या वतीने झाल्याबद्दल धन्य झालो असल्याचे आ.महेंद्र थोरवे यांनी बोलताना सांगितले. रस्ते गटारे होत राहतील. परंतु हिंदू धर्म पुढे जगविण्यासाठी मंदीराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच मोगलवाडीतील ग्रामस्थांनी सुंदर मंदीर सत्यात उतरविले त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.