नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेहला जोडणाऱ्या एका वैशिष्ट्यपूर्ण बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. अटलबिहार वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर असताना या कामाची संकल्पना मांडण्यात आली होती. सन 2010 मध्ये यूपीए सरकारच्या काळात कामाचा पायाभरणी समारंभ होऊन त्याचे काम सुरू झाले. सन 2014 पर्यंत बोगदा खणण्याचे जवळपास निम्मे काम पूर्ण झाले होते.
उर्वरित काम नंतरच्या सहा वर्षांच्या काळात पूर्ण करण्यात आले आहे. दहा हजार फूट उंचावर उभारण्यात आलेला अशा प्रकारचा जगातला हा पहिलाच प्रकल्प आहे. हा बोगदा 9.02 किमीचा आहे. दुहेरी रस्ता असलेल्या या मार्गावरील वाहतूक घनता प्रति दिन तीन हजार मोटार कार आणि पंधराशे ट्रक इतकी ठेवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास जवळून हा बोगदा जातो. त्यामुळे हिमाचल ते लेह हे अंतर बरेच कमी होणार असून लष्कराला या बोगद्याचा विशेष उपयोग होणार आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की आधीच्या सरकाराच्या काळात हे काम रखडले होते पण आम्हीं ते वेगाने मार्गी लावले आहे. लष्करी सिद्धतेशी संबंधीत प्रकल्प वेगाने पुर्ण करण्याची आमची कटिबद्धता असून आधीच्या सरकारांनी नेहमीच अशा प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका मोदी यांनी यावेळी करीत कॉंग्रेसचे नाव न घेता त्यांनी कॉंग्रेसला यावेळी टोले लगावले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झाले आहे त्यामुळे हा एक ऐतिहासिक दिवस आहे असेही त्यांनी नमूद केले. या बोगद्यातील रस्त्याद्वारे सीमावर्ती भागात जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे असे ते म्हणाले.
सीमा भागातील रस्ते प्रकल्प त्वरेने पूर्ण करा, अशी मागणी सातत्याने होत राहिली पण आधीच्या सरकारांच्या काळात ही कामे मध्येच रखडवण्यात आली होती असा आक्षेपही पंतप्रधानांनी यावेळी नोंदवला.