काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून ते येत्या ४ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत. वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांसोबत त्यांच्या भगिनी तथा उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा या देखील उपस्थिती लावणार आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्याने वायनाड मतदारसंघाला राजकीय वजन प्राप्त झाले असून भाजपसह केरळातील सत्ताधारी डाव्या पक्षांनी देखील राहुल गांधी यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. भाजपतर्फे काल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून ‘एनडीए’मधील सहयोगी पक्ष ‘भारत धर्म जन सेने’चे अध्यक्ष तुषार वेल्लाप्पल्ली यांची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या मागणीला मान देत केरळातून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये जोश आहे. राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ते आपल्या पारंपरिक मतदारसंघाकडे पाठ फिरवणार नसून ते अमेठीतूनही लोकसभा लढवणार आहेत.
Priyanka Gandhi Vadra (file pic) to accompany Congress President Rahul Gandhi to Wayanad in Kerala for filing of his nomination from the parliamentary constituency. pic.twitter.com/UhCuQpQhKb
— ANI (@ANI) April 2, 2019