पुणे -राज्यात लोकांचे सरकार आले आहे. जी कामे अडीच वर्षात झाली नाही ती गेल्या पाच महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या आधी वर्षा निवासस्थानाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंद होते. आता ते सर्वांसाठी खुले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचे काम हे सरकार करीत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाकेबाज निर्णय घेत आहेत, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे “बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे हे कोणत्या टिकेला उत्तर देत नाहीत. ते कामातूनच उत्तर देतात, असे सांगत डॉ. शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
“बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात खासदार डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे प्रतोद आमदार भरत गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, प्रवक्ते नरेश म्हस्के, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवा सेनेचे प्रदेश सचिव किरण साळी, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, महिला आघाडीच्या लीना पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांचा सत्कार भानगिरे यांनी केला.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, पूर्वीचे मुख्यमंत्री हे मंत्री, खासदार आणि आमदारांना सुद्धा भेटत नव्हते. सर्वसामान्य कार्यकर्ते लांबच राहिले. नेतृत्वावर विश्वास राहिला नाही म्हणून उठाव झाला. त्यामुळे सत्तेला लाथ मारून 50 आमदार आणि 13 खासदार शिवसेनेतून बाहेर पडले. सर्वसामान्य घरातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला आहे. पूर्वी फक्त घोषणा केल्या जायच्या आता अंमलबजावणी केली जात आहे.
आमदार गोगावले म्हणाले की, पूर्वीचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पराभूत झालेल्या आमदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेत होते. मात्र, आम्ही आमदार असून आम्हाला निधी देत नव्हते. याच कारणातून उठाव झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी आता कामातून जनतेचे लक्ष वेधले आहे. ते पंधरा-पंधरा तास काम करतात, त्यांना कधी थकलेले पाहिले नाही.
पुण्यात स्वतंत्र बैठक घ्यावी : प्रमोद भानगिरे
महापालिका प्रशासन काहीच काम करत नाही. आगामी पालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना तयार असून पालिकेवर भगवा पडकविल्या शिवाय राहणार नाही. पुणे शहरातील अशाच विविध समस्या सोडविण्यासाठी जास्त लक्ष देण्याची गरज असून पुण्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करावी, अशी मागणी शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी आपल्या भाषणातून केली.
सकाळी “तो’ भोंगा सुरू होतो…
दररोज सकाळी “तो’ भोंगा सुरू होतो, त्यामुळे लोकांचा दिवस खराब होतो, अशा शब्दात खासदार डॉ. शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. खंजीर, खोके आणि गद्दार हेच शब्द त्यातून बाहेर पडतात. पूर्वी हे खोके कोणाकडे जायचे, पैसे कोण मोजायचे हे सर्व राज्याला माहिती आहे. आता, हे खोके बंद झाले म्हणून ओरड सुरू झाली आहे. आता, खोके पुन्हा सुरू होणार नाहीत, असे सांगत विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला.