प्रा. डी. के. वैद्य
अकोले – अकोले तालुका हा डाव्या विचारांचा व चळवळीचा तालुका आहे. त्यामुळे या मातीमध्ये उजवा विचार रुजणे केवळ अशक्य आहे. हे आजच्या विधानसभा निवडणूक निकालाने दाखवून दिले. नैसर्गिक वातावरणामधल्या अकोले तालुक्याला भौगोलिक समृद्धी लाभलेली आहे. कळसुबाईचे उंच शिखर, हरिश्चंद्रगड, रतनगड, गडकोट किल्ले असल्याने या तालुक्याला समृद्ध जसा भौगोलिक वारसा आहे. तसाच ऐतिहासिक वारसाही आहे. राघोजी भांगरे यांचे बंड याच मातीत झाले. तर डावा विचारही या तालुक्याने पचवला. जंगलतोड सत्याग्रह किंवा टिटवाळा येथे असणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या परिषदेला अकोले येथून कार्यकर्त्यांची बैलगाडीने निघालेली ऐतिहासिक मिरवणूक या सर्व बाबी त्याची साक्ष देतात.
गेल्या 1952 सालापासून डावा विचार कायम रुजलेला या ठिकाणी आढळून आलेला आहे. कधी कॉंग्रेस, कधी समाजवादी पक्ष, तर कधी भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या विजयाची नोंद येथील विधानसभा निवडणुकीतही इतिहासात घेतली गेली. तर 1990 सालानंतर निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारालाही कधी येथे अंगावर गुलाल घेता आला नाही. अशा सर्व एकूण पार्श्वभूमीवर 2014 सालच्या निवडणुकीमध्ये अशोक भांगरे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. आणि 27 हजार मते मिळवली. परंतु ही मते केवळ अशोक भांगरे यांची होती व त्याच्यात नगण्य हिस्सा होता. तो भाजपचा.
अशा पार्श्वभूमीवर बदलत्या व बदलत्या राजकीय लाटेवर स्वार होऊन राज्य व केंद्राचा हवाला देत पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला. येथील उमेदवारी शिवसेनेची असतानाही मतदारसंघाचा बदल केला गेला. आणि या ठिकाणाहून भाजपचा उमेदवार विजयी होईल, अशी विजयाची स्वप्ने पिचड यांनी पाहिली. परंतु मतदारांनी मात्र डाव्या चळवळीच्या तालुक्यात हा उजवा विचार रुजू शकत नाही हेच दाखवून दिले. यामागे अनेक कारणे असतीलही.
कदाचित पाडोशी धरणाचे पाणी सोडले गेले नसल्याची नाराजी समशेरपूर गटात असेल, तर पिंपळगाव खांड धरणाचे पाणी खाली सोडले गेले, हेही कारण पिचड यांच्या पराभवाचे असू शकेल. परंतु त्यामुळे उजवा विचार आपण घेऊन विजयी होऊ शकतो. हा ठाम आत्मविश्वास पिचड पिता-पुत्रांना पराभवापर्यंत घेऊन गेला. शिवाय पक्षांतर करणे म्हणजे आपल्या पाठीमागे मतदार येतील. हाही भ्रम मतपेटीने पिचड पिता-पुत्रांच्या डोक्यातून काढून टाकला आहे. लोकसभा निवडणुकीला मिळालेला मताधिक्याचा जोगवा, हा आपल्या पाठीमागे राहील. आपली ही समजूत बरोबर घेऊन पिचड पितापुत्र भाजपत गेले. परंतु लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला अकोले विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. ती पक्षांतरानंतर त्यांच्याबरोबर राहिली नाही, हे यातून उघड झाले.
स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून खरे म्हणजे मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्या धोरणाचा प्रचार हा मुद्दा त्यांना विजय मिळवून देऊ शकला नाही. याउलट डॉ. किरण लहामटे यांना मतदारांच्या बरोबरच इतर सर्व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रामाणिक साथ दिली. पठार भागावर थोरात यांचा वरचष्मा राहिला. हे यातून दिसून आले. समशेरपूर गटामध्ये बाजीराव दराडे, मारुती मेंगाळ यांची साथ मिळाली. तर इतर भागांमध्ये तसे आघाडीचे दृश्य दिसत असले तरीही मताधिक्य आणि मतपेटी यातील पिचड यांना जे अधिक दूर होणारे नाते ते पवारांच्या मुळे राहिले असल्याचे बोलले जाते. मत पिचड साहेबांच्या घड्याळाला. हा जो मतदारांच्या डोक्यात घट्ट बसलेला विचार, खरं म्हणजे चिन्ह बदलूनही कायम राहिला आणि त्यामुळे ही त्यांचा पराभव झाला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.